महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वामुळे मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकत राहिला…

डॉ. ज्योती तोरसकर:श्री शिवाजी वाचन मंदिरच्या व्याख्यानमालेत डॉ. ज्योती तोरसकर यांचे प्रभावी विवेचन संपन्न..

⚡मालवण ता.१९-:
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्यावर जेव्हा मोगलांचे सर्वात मोठे संकट आले तेव्हा महाराणी ताराराणी यांनी आपल्या अजोड शौर्याने, धैर्याने स्वराज्याची धुरा सांभाळली. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्यावर निराशेचे ढग होते तेव्हा ज्या स्वराज्याच्या ढाल बनून पुढे आल्या त्या ताराराणी होत्या, औरंगजेबाचा अहंकार ज्या मातीत तुटला त्या संघर्षाचे नाव म्हणजे ताराराणी होय. महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वामुळे मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकत राहिला, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. ज्योती तोरसकर यांनी येथे बोलताना केले.

श्री शिवाजी वाचन मंदिर मालवण यांच्या वतीने आयोजित कै. श्रीपाद वाघ पुरस्कार व कै. राजाभाऊ भोसले स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यात आले. भरड येथील दत्त मंदिर प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात ‘मोगल मर्दानी, शिवस्नुषा ताराराणी’ या विषयावर मुख्य वक्त्या डॉ. सौ. ज्योती तोरसकर यांनी महाराणी ताराराणी यांचा पराक्रमाने ओथंबलेला इतिहास अत्यंत प्रभावीपणे मांडला. या व्याख्यानातून इतिहासाचे तेजस्वी सुवर्णपान पुन्हा एकदा उजळून निघाले तर उपस्थित मालवणवासिय ताराराणी यांच्या शौर्यगाथेने मंत्रमुग्ध झाले.

यावेळी डॉ. ज्योती तोरसकर यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने आणि धारदार वाणीने श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेतला. तोरसकर यांचे प्रत्येक वाक्य जणू शब्दांची समशेर उगारल्यासारखे भासत होते. दत्त मंदिर प्रांगणात उपस्थित असलेला प्रत्येक श्रोता या व्याख्यानाने मंत्रमुग्ध झाला होता. ताराराणींच्या शौर्याची आणि राष्ट्रनिष्ठेची गाथा ऐकताना उपस्थित जनसमुदाय स्तब्ध झाला होता. या व्याख्यानाने केवळ इतिहासाची उजळणी केली नाही, तर प्रत्येकाच्या मनात स्वराज्याची ज्वाला पुन्हा एकदा प्रज्वलित केली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका श्रीमती शर्वरी पाटकर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रभुदास आजगांवकर यांनी केले. या व्याख्यानमालेला मालवणमधील इतिहासप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page