⚡मालवण ता.१०-:
स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मालवण मधील ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सामाजिक कार्य, युवा सक्षमीकरण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि पर्यावरण संवर्धन या चारही क्षेत्रात सातत्याने आणि प्रभावी कार्य केल्याबद्दल मांजरेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
सदर पुरस्काराची घोषणा स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री .संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हा पुरस्कार कोकणातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यावर्षीच्या निवडीमध्ये गुणवत्तेला, सातत्याला आणि समाजकारणातील प्रभावी योगदानाला विशेष महत्त्व देण्यात आले होते. सदर पुरस्कारासाठी १४०० पेक्षा जास्त नामांकन मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतून आले होते.त्या पैकी निवडक व्यक्तींच्या सामाजिक कार्याची दखल पुरस्कारासाठी घेतली गेली आहे. यामध्ये ऍड. ऐश्वर्य मांजरेकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदाना जवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
