राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू…

जिल्हा परिषदेसमोर भर पावसात आंदोलन सुरु:जिल्ह्यातील ७०० कर्मचारी आंदोलनात सहभागी,२२ ऑगस्ट पर्यंत आंदोलन राहणार सुरु..

कुडाळ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्तगत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचे १४ मार्च २४ च्या शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेतील समायोजन अदयाप न केल्याने आणि इतर न्याय मागण्याबाबत विलंब होत असल्याने या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १९ ऑगस्ट पासून जिल्हा परिषद समोर कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०० कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एनएचएम अंतर्गत कामकाज ठप्प झाले आहे. दि. २२ऑगस्ट पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. आगामी काळात गणेशोत्सव असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये यांची काळजी घेत फक्त चार दिवस हे आंदोलन करत असून शासनाने आपल्या मागण्या गणेशोत्वापूर्वी मान्य कराव्यात अशी मागणी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील दहा वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झालेल्या कंत्राटींना ३० टक्केच्या मर्यादित शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा शासन निर्णय 14 मार्च 2024 रोजी झालेल्या आदेशाच्या अंमलबजावणीला विलंब होत असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकरण समितीने राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारला आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यभरातील हे कंत्राटी कर्मचारी १९ऑगस्ट पासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र केवळ २२ ऑगस्ट पर्यंत आंदोलन केलं जाणार आहे, असं स्पष्ट करण्यात आल आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ७०० पेक्षा जास्त कर्मचारी या अभियानांतर्गत कार्यरत आहेत. शासन आदेशानुसार त्यापैकी सुमारे २४० कर्मचाऱ्यांची वर्णी कायमस्वरूपी शासन सेवेत लागणार आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या केला जात असल्याचा आरोप करत प्रशासकीय कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी समन्वय संघटना शाखा सिंधुदुर्ग नाराजी व्यक्त केली आहे.
या मागणी बरोबरच वर्ग तीनच्या पदांचा समायोजन करण्यास तात्काळ मान्यता द्यावी दरमहाचे वेतन वेळेत देण्यात यावे. सन २०२४-२५ आणि २५-२६ ची मासिक वेतन वाढ आणि रॉयल्टी बोनस मंजूर असून तो अदा करण्यात यावा. दहा वर्षाच्या आतील एन एच एम अधिकारी कर्मचारी यांना बदली धोरण लागू करावं. सर्व एनएचएम अधिकारी व कर्मचारी यांना ईपीएफची योजना व गट विमा लागू करण्यात यावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.
गट क संवर्गाच्या नियमित पदाच्या सम कक्ष व शैक्षणिक अर्हतेनुसार समकक्ष कार्यरत तांत्रिक व अतंत्रिक पदांची अंतिम सेवाजेष्ठता यादीसह एकत्र संवर्गाची माहिती राज्य शासनास सादर झालेली असून नियुक्ती आदेश देणे बाकी आहे. असे असतानाही आरोग्य मंत्री व संबंधित विभागाचे अधिकारी नियमित पदभरती सुरूच ठेवून समायोजनाबाबत चालढकल करून कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे, सचिव अजित सावंत, राज्य समन्वयक कर्मीस अल्मेडा, जिल्हा जिल्हा लेखा व्यवस्थापक आत्माराम गावडे, संतोष खानविलकर, तिलोत्तमा मुननकर, शंकेतन कदम, दया कांबळे, गणेश वेतुरेकर, लीना अल्मेडा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

You cannot copy content of this page