सरपंच वेदिका नाईक:उपवनसंरक्षक यांना पत्र सादर..
⚡बांदा ता.११-: डेगवे-तांबुळी रस्त्याच्या मोयझरवाडी येथून वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या मार्गाच्या खडीकरण व डांबरीकरणास परवानगी मिळत नसल्याने भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण देसाई यांनी स्वातंत्र्यादिनी पुकारलेल्या उपोषणास तांबुळी गावाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे पत्र सरपंच वेदिका नाईक यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षक यांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डेगवे-तांबुळी रस्ता हा पंतप्रधान सडक योजनेतून मंजूर झालेला असून सदरचा ७०० मीटर रस्ता हा वनखात्याच्या हद्दीतून गेलेला आहे. सदर रस्ता हा गावांतर्गत जोड रस्त्यांना जोडलेला आहे. तांबुळी पंचक्रोशीतील अनेक गावातील ग्रामस्थ बांदा येथे आठवडा बाजार किंवा आरोग्य सेवेसाठी जाताना याच मार्गाचा वापर करतात. हा जवळचा व सोईस्कर रस्ता असल्याने या मार्गावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. सदर ७०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने हा रस्ता खड्डेमय व चिखलमय झाला आहे.
भविष्यातील येथे होणारे गंभीर अपघात टाळण्यासाठी प्रवीण देसाई यांनी पुकारलेले उपोषण हे योग्य असून या उपोषणाला तांबुळी येथील सर्व ग्रामस्थांचा पूर्णपणे पाठिंबा राहील. तसेच उपोषणा दिवशी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ प्रत्यक्ष सहभागी होतील.