आश्वासन देऊन कोणतीही हालचाली झाली नसल्याने आता माघार घेणार नाही; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा..
⚡सावंतवाडी ता.०९-:
धाकोरे गावातील होळीचे भाटले – अशोक साटेलकर – रघुनाथ मुळीक घरापर्यंतचा कायदेशीर सार्वजनिक रस्ता ( २३ नंबर) गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे अडथळाग्रस्त आहे. ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कृती न झाल्याने, “उपोषण केल्याशिवाय काम का होत नाही?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतचा प्रवास
२६ जानेवारी २०२५ – पहिल्या टप्प्यातील जाहीर उपोषण, ओरोस येथे. प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्ष कृती शून्य.१ मे २०२५ – दुसरे उपोषण जाहीर, पण ३० एप्रिल रोजी ग्रामपंचायत व बीडीओकडून ३० दिवसांत अतिक्रमण हटवून रस्ता डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन. उपोषण मागे घेतले.या दोन्ही वेळा उपोषणाची तारीख जाहीर होताच प्रशासनाने हालचाल दाखवली, मात्र रस्ता पूर्ण मोकळा झाला नाही.
सध्याची स्थिती आणि आव्हानं
१५ ऑगस्ट रोजी तिसऱ्या टप्प्यातील उपोषण जाहीर होताच पुन्हा काही हालचाल सुरू झाली. पण कामाला वेळ लागणार असल्याचं सांगत, पुन्हा ‘आश्वासन’ देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती सुरू झाली आहे.ग्रामस्थांचा ठाम नकार – “यावेळी केवळ प्रत्यक्ष, कायदेशीर आणि अधिकृतपणे रस्ता क्रमांक २३ पूर्ण मोकळा करून पक्का झाल्यावरच उपोषण मागे घेतले जाईल.”
ग्रामस्थांच्या मते, प्रत्येक वेळी उपोषणाच्या घोषणेनंतरच काम सुरू होते आणि काही दिवसांतच थांबते. अनेक महिने थांबवूनही निकाल न लागणे हीच सर्वात मोठी समस्या आहे.या रस्ता च्या दुरवस्थेमुळे किंवा उपोषणामुळे जर कोणताही अपघात, जीवितहानी किंवा आरोग्याशी संबंधित अडचण उद्भवली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन, ग्रामपंचायत व संबंधित विभागांची राहील असा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला.
