⚡मालवण ता.०३-: कणकवली आचरा या मुख्य रस्त्यावरील चिंदर बाजार ते आचरा दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना समजत नाही अशीच काहीशी दुरवस्था या रस्त्याची झालेली आहे. गेल्या वर्षी चतुर्थी पूर्वी ऑगस्ट महिन्या मध्ये सदर रस्त्याचे खड्ड्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलमपट्टी करून बुजविण्याचे काम करण्यात आले होते. परंतु ती मलमपट्टी वाहनांच्या वर्दळीमुळे काही दिवसातच गेली होती.
दरम्यान सध्या या रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठया खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मात्र कसरत करावी लागत आहेत. विशेष करून दुचाकी स्वार आणि रिक्षा चालक यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याचदा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात या परिसरात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील खड्डे तातडीने बुजावावेत तसेच लोक प्रतिनिधीनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक रहिवाशी यांच्या कडून होत आहे.