सावंतवाडी ता.०६-: तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथील शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात ४ शेतकरी गंभीर जखमी केले. मळेवाड प्राथमिक उपकेंद्रात प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी उपवनसंरक्षक, वनविभाग कर्मचारी, पोलिस दाखल झाले आहेत.
मळेवाड येथील बिबट्याच्या हल्ल्यात प्रभाकर राऊळ, सुर्यकांत सावंत, पंढरी आजगावकर, आनंद न्हावी हे चार शेतकरी गंभीर जखमी झाले. अधिक उपचारासाठी त्यांना गोवा-बांबोळी येथे रवाना करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच उप वनसंरक्षक मिलीश शर्मा मळेवाड येथे रवाना झाले आहेत. मळेवाड येथील प्रभाकर मुळीक यांच्या घरामागे कुत्रा व मांजराला आपला भक्ष करण्यासाठी बिबट्या आला होता. श्री. मुळीक यांना घराच्या मागच्या बाजूला कोणाचीतरी चाहूल लागल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांच्यासमोरच बिबट्या दिसला. यावेळी बिबट्याने मुळीक यांच्यावर हल्ला चढवत पंजाचा मारा केला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी दुखापत झाली. मुळीक यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून पलायन केले. यानंतर जखमी मुळीक यांना उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.
याच दरम्यान देऊळवाडी येथील सुर्यकांत सावंत यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी त्यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवले. यावेळी त्या ग्रामस्थांमधील पंढरी आजगावकर, आनंद न्हावी यांना बिबट्यानं जखमी केले. या घटनेची माहिती वनविभागला देण्यात आली. यानंतर वनविभागासह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. दिवसाढवळ्या भरवस्तीत येऊन बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. श्री. मुळीक यांच्या घरामागील बागेत चारही बाजूला पावसाचे पाणी साचलं असल्याने बिबट्यास पाण्यातून बागेबाहेर जाणं कठीण आहे. त्यामुळे तो बागेतच असावा असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे. वनविभागने बिबट्याला जेर बंद करावे अशी मागणी केली जात आहे.