आम. निलेश राणे:कुडाळमध्ये कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच वितरण..
कुडाळ : कामगार आपल्याकडे कधी काही मागत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजना त्यांना देणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच वितरण कार्यक्रमावेळी ते कुडाळ येथे बोलत होते.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच वितरण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला याचे आयोजन सिंधुदुर्ग स्वाभिमानी कामगार संघाच्या वतीने कुडाळ येथे करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, सरकारी कामगार अधिकारी अजिंक्य बावले, स्वाभिमानी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे, कामगार सेनेचे जिल्हा सचिव मंगेश चव्हाण, जिल्हा संघटक अशोक बावलेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, शहर प्रमुख रोहित भोगटे उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, कामगारांसाठी असलेल्या या कल्याणकारी योजना त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात लाभ देणारे आहे. त कामगारांच्या मुलाच्या लग्नात असो किंवा कामगाराच्या मृत्यूपर्यंत असो ही योजना प्रत्येक क्षणाला साथ देणारी आहे. त्यामुळे ही योजना अजून दुर्लक्षित असलेल्या कामगारांपर्यंत घेऊन जाणे हे प्रत्येकाचे काम आहे. कामगार कधीच आपल्याकडे काही मागत नाही. या योजनेच्या माध्यमातून आपण कामगारांना सक्षम बनवणे हे आपले कर्तव्य आहे. अजून काही योजना आहेत त्या संदर्भातही लवकरच आयुक्तांसोबत संघटनेची बैठक घेऊन या संयोजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आमदार निलेश राणे यांनी सांगून आम्ही सुद्धा कामगार संघटनांमध्ये काम केलेले आहे, त्यामुळे कामगारांची दुःख काय असतात हे आम्हाला माहित आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
तर यावेळी कुडाळ तालुक्यातील एकूण १ हजार ४०० कामगारांना तीन दिवसांमध्ये हे साहित्य वाटप केले जाणार आहे. या वितरणाचा कार्यक्रम कुडाळ येथे झाला. यामध्ये ६३९ कामगारांना साहित्य वाटप करण्यात आले अशी माहिती सिंधुदुर्ग स्वाभिमानी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली.
