मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाची महत्वाची सभा भांडुप येथे संपन्न…

कुडाळ, प्रतिनिधी

भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिर येथील सभागृहामध्ये अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाची महत्वाची सभा ४ जाने.२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत कोकणच्या तमाम भजनीकलावंतांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी जपत भजनसम्राट,भजनी कलावंत, पखवाज वादक, कोरस, दशावतारी कलावंत यांच्या ऐक्याचा महामेरू निर्माण करण्यासाठी जुने नवीन कलावंत एकवटले होते. कलावंताना यथोचित सन्मान,आदरभाव, हक्क , वैद्यकीय सेवा विमा मिळवून देण्यासाठी तसेच अडिअडचणीच्या संकटात सर्वजण एकजुटीने सह्याद्री पर्वतासारखे भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याचा निर्धार हेच ब्रीद असल्याचे ध्येय असल्याचे विचार व्यक्त करण्यात आले. भजनप्रेमी, कलाकारांनी भांडुप येथील झालेल्या द्वितीय सभेला अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी कोकणची भजनसंस्कृती समृद्ध करणारे बेधडक स्वभावाचे रोखठोक विचारसरणीचे जहाल विचारांनी अन्यायाला पायदळी तुडविणारे भजनसम्राट बुवा बाबाजी कानडे यांनी यांची आदरपूर्वक नियुक्ती करण्यात आली. या सभेची सुरुवात करण्यास अध्यक्षांनी अनुमती दिली. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाची सर्वानुमते ध्येय धोरणे ठरविण्यात आली. सुरुवातीला व्यासंगी जेष्ठबुवा भजनसम्राट सन्मानीय वाळवे बुवा यांनी भजनी बुवांची व्यथा, भजनी कलावंतांचे अनेक प्रश्न मांडले. भजनी कलावंतांच्या हितासाठी आपण काय करायला हवे? आपले अनुभवसिद्ध असे अनमोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर कोकणची शान, सिंधुदुर्गाचा अभिमान असे टक्केबुवा यांनी आपल्या ओजस्वी शब्दांनी उपस्थितांची मने जिंकली. व्यासंगी, अभ्यासपूर्ण, कायदेशीरपणे आपण मंडळाच्या ध्येय धोरणांबाबत विचार व्यक्त केले. टक्के बुवांनी आपण सर्वतो सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहू असे विचार मांडले. सरस्वती मातेचा वरदहस्त लाभलेले त्यांचे वक्तृत्व श्रोत्यांना जागीच खिळवून ठेवणारे होते.‌ आपण मंडळाच्या हिताच्या दृष्टीने विकासात्मक वाटचाल करीत असताना आपली कला आत्मसात करताना आपल्याला आधी सिद्ध करावे. आपली गुणवत्ता, प्रतिभा ही अथक प्रयत्नानी सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली तर आपोआपच आपल्याला कलेच्या क्षेत्रात संधी मिळत राहील. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ परिषद स्थापन करण्याचे ईप्सित सन्माननीय ख्यातनाम भजनीबुवा, कोकणवासीयांचा संकटसमयी मदतीसाठी धावून येणारे देवत्वरुपी संजय गावडे बुवा यांनी समजावून सांगितले. खरेतर संजय गावडेबुवांनी एक एक मावळा एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाप्रमाणे अहोरात्र मेहनत करून अनेकांच्या भेटी घेऊन अनेक कलावंतांना ऐक्यासाठी आपुलकीने, आत्मियतेने ऐक्याच्या विचाराचे महत्त्व सांगितले. खरेतर हे मंडळरुपी रोपटे लावताना गावडेबुवा यांनी लहानथोर, जेष्ठ-कनिष्ठ कलावंतांना सर्वांना आपलेपणाची ओढ निर्माण करुन एकत्र आणले. गावडे बुवा अखंड कोकण मुंबईमध्ये विखुरलेल्या भजनी कलावंताना आपुलकीची आत्मियतेची हाक दिली. वाळवे बुवांनी आपल्या वैयक्तिक अनुभवाचे अनेक दाखले देत आपल्या मार्गदर्शनपर विचारात ‘सर्वधर्मसमभाव’ वृत्तीचे महत्त्व असणे हीच मंडळाची प्राधान्य गरज असल्याचे मत प्रतिपादन केले. जेष्ठ भजनसम्राट आणि ट्वेंटी ट्वेंटी ( २०-२०) भजनकलेचे प्रणेते अणा मार्गी बुवा यांनी पारंपरिक भजन आणि आजकालच्या भजनीपरंपरेबाबतचे परखड विचार व्यक्त करताना मंडळासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त सभासद सदस्य आपुलकीने जोडण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असा विचार मांडला.
त्यानंतर सभेचे अध्यक्ष, भजनसम्राट बाबाजी कानडे बुवांनी आपल्या छोटेखानी पण जहाल भाषणात बेधडक विचारांनी अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ परिषदेच्या आदर्श ध्येय धोरणांचा जणू आरसाच उभा केला. वैयक्तिक अनुभव व्यक्त करताना दुजाभाव करणा-या, पदासाठी चिकटून बसलेल्या निष्क्रिय स्वार्थी वृत्तीचा चांगलाच समाचार घेत,कोते विचार असलेल्या वृत्तीचा फडशा पाडत अक्षरशः जहाल भाषणातून बेधडकपणे वाभाडे काढले. कलावंताच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कलावंतांच्या हितासाठी सुखदुःखाच्या प्रसंगी, संकटाच्या प्रसंगी रात्री अपरात्री मदतीसाठी धावून येण्यासाठी मंडळ असले पाहिजे व यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहु या, असा विचार विचार मांडला. त्यांच्या जहाल भाषणाला जमलेल्या समुदायांनी प्रचंड टाळ्यांनी साथ दिली. सर्वानुमते मंडळ रजिस्ट्रेशनच्या कार्यासाठी कार्यकारिणीची नियुक्ती करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. लवकरच कार्यकारिणीवरील पदाधिका-यांची नावे सर्वानुमते निश्चित करुन रजिस्ट्रेशनसाठी देण्यात येणार असल्याचे मत सन्माननीय संजय गावडे बुवा, अण्णा मार्गी बुवा, पांडुरंग सावंत बुवा, वाळवे बुवा, टक्के बुवा,बाबाजी कानडे बुवा यांनी उपस्थितांना सांगितले.

न भूतो न भविष्यति!
असा पहिलावहिला भव्य दिव्य डबलबारी महोत्सव महाराष्ट्रात लवकरच मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याचे गावडे बुवा यांनी बोलताना व्यक्त केले.
तसेच प्रतिवर्षी डबलबारी महोत्सवाचे आयोजन करुन नवोदित भजनीबुवांना संधी देण्यात येणार आहे. प्रतिवर्षी कोकण रत्न, भजनरत्न, जीवनगौरव पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. या पुढे शासनाने कलाक्षेत्रासाठी घोषित केलेले पुरस्कार मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्या शुभहस्ते भजनी कलावंतानाही प्रदान करण्यात येण्यासाठीणा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला मुंबई कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक सदस्य उपस्थित होते बुवा सूर्यकांत कदम, सुरेश पाटील, विठ्ठल परब, तुकाराम राणे, आना मार्गी, प्रमोद परब, दिलीप गोसावी, सदानंद जाधव, महेंद्र सावंत, संतोष राणे, दीपक तांबे, बाळकृष्ण आईर, राजाराम पांडुरंग सावंत, देवेंद्र ईस्वलकर, संदीप पाताडे, किरण कुमार चव्हाण, सचिन सावंत, सिताराम पाटकर, विठोबा मोडक, गोविंद धुरी शामसुंदर चव्हाण, राजेश मर्गज, हरिश मार्गी इत्यादी बुवा उपस्थित होते.

You cannot copy content of this page