वेंगुर्ले येथे ३० डिसेंबर रोजी महारक्तदान शिबीर…

वेंगुर्त्यात रक्तपेढीच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम : ॲड. नंदन वेंगुर्लेकर..

⚡वेंगुर्ले ता.२८-: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सर्वांनाच मान्य आहे. मात्र, अनेकजण रक्तदान करण्यास घाबरतात. रक्तदानामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असा पुसटसा गैरसमज अनेकांमध्ये असतो. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हयात रक्त तुडवड्याची समस्या सातत्याने निर्माण होत राहते. नवीन रक्तदाते तयार व्हावे व प्रत्येकाच्या मनातील भीती दूर करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ल्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात २०० हून अधिक रक्तदाते सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. सोमवार ३० डिसेंबर रोजी सकाळी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात हे शिबिर होणार आहे, अशी माहिती आधार फाऊंडेशनचे सचिव ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्लातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था, पर्यटन संस्था, निमशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्यातून हे महारक्तदान शिबीर यशस्वी करण्यात येणार आहे. यासाठी आधार फाऊंडेशनतर्फे अनेकांची वैयक्तिकरित्या प्रत्यक्ष भेट घेऊन महारक्तदान शिबिराच्या यशस्वीततेसाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. वेंगुर्ले तालुका हा लोकसंख्या व आकाराच्या दृष्टीनेही लहान असला तरी रक्तदात्यांची संख्या आश्वासक आहे. गेल्या काही वर्षांपासून वेंगुर्ल्यातील काही संस्था रक्तदानाच्या चळवळीत सक्रीय सहभागी आहेत. त्यामुळेच वेंगुर्त्यात सर्वाधिक रक्तदाते आहेत. असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलिकडच्या काळात अपघात व हृदयविकारच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला वारंवार रक्ततुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊनच हे महारक्तदान शिबीर घेण्याचे नियोजन केले आहे. एका रक्तदात्याला वर्षातून केवळ चारवेळा रक्तदान करता येते. रक्ताची गरज वाढली असून रक्तदात्यांच्या संख्येत मात्र फारशी वाढ होत नाही. त्यामुळे जोपर्यंत नवीन रक्तदाने तयार होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला या समस्येला सामोरे जावे लागणार आहेत. अजूनही अनेकांच्या मनामध्ये रक्तदानाबाबत गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्याचे काम आधार फाऊंडेशनतर्फे सुरू आहेत. रक्तदानामुळे आरोग्यदृष्ट्या कोणते फायदे होतात याचेही समुपदेशन केले जात आहे, असे वेंगुर्लेकर म्हणाले. तर डॉ. वंदन वेंगुर्लेकर यांनी रक्तदानामुळे कोणते फायदे होतात व रक्तदान का करावे याबाबतची माहिती दिली. यावेळी आधार फाऊंडेशनचे जयराम वायंगणकर उपस्थित होते. ३० डिसेंबर राजी सकाळी ८ ते १ या वेळेत हे महारक्तदान शिबीर होणार आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आधार फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
वेंगुर्ले तालुक्याला सुदैवाने दोन उपजिल्हा रुग्णालये आहेत. असे असले तरी वेंगुर्ल्यात आरोग्य सुविधांची वानवाच आहे. रुग्णालये सुसज्ज करण्यात आली असली तरी या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञांची कमतरता आहे हे आपले दुर्दैव आहे. वेंगुर्ले तालुका एका बाजूला असल्याने वेंगुर्ल्यातील जनेतच्या सोयीसाठी शहरात रक्तपेढी व्हावी, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. नवनिर्वाचित आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पाठपुरावा करून वेंगुर्लातील आरोग्य सुविधा अध्ययावत करण्यात येतील, असेही नंदन वेंगुर्लेकर म्हणाले.

You cannot copy content of this page