जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी : मच्छीमार बांधवांना दिलासा;मत्स्य उद्योजक तपस्वी मयेकर यांची माहिती
*💫मालवण दि.०८-:* कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावत असल्याने मच्छीमार बांधवानी गतवर्षीप्रमाणे सर्व खबरदारी मासेमारी व्यवसाय करावा. शासनाच्या नियमावलीचे उल्लंघन न करता सामाजिक अंतर व मास्कचा वापर करूनच व्यवसाय करावा. लिलावधारक, मत्स्य विक्रेत्यांनी कोरोना खबरदारी घेऊन व्यवसाय करणे बंधनकारक असेल तसेच शक्य असल्यास घरोघरी जाऊन मासळी विक्रीवर भर द्यावा, अशा सूचना देत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी विकेंड लॉकडाऊनमध्ये मासेमारी, मासेविक्री व्यवसायासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांना शिथिलता देत मच्छीमार बांधवांना दिलासा दिला, अशी माहिती मत्स्य उद्योजक तपस्वी मयेकर यांनी दिली आहे.
कोरोनाच्या उद्रेकामुळे जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीमध्ये मासेमारी व्यवसायासाठी कडक निर्बंध लावण्यात आले होते. याबाबत मच्छीमारांनी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी मत्स्य व्यावसायिक विकी चोपडेकर, गोपीनाथ तांडेल, सुधीर जोशी आदी मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मच्छीमार प्रतिनिधी यांनी मुद्दे मांडले. मासे हा प्रकार जिल्हावासीयांच्या रोजच्या आहाराशी संबंधित आहे. तसेच मासेमारी हा शेतीविषयक व्यवसाय असल्याने अत्यावश्यक सेवेत येतो, असे मच्छीमारांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी यांनी मासेमारी व्यवसायातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणत कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रत्येक मच्छिमाराने प्रशासनाला सहकार्य करावे, अशा सूचना केल्या.
शनिवार व रविवारी असलेल्या विकेंड लॉकडाऊनमध्ये मासेमारी व्यवसायात शिथिलता मिळवून देण्याकरिता आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्या समवेत महत्वपूर्ण बैठक आयोजित करून मच्छीमारांच्या बाजूने दिलासादायक निर्णय झाल्याबद्दल मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने आमदार नाईक यांचे आभार मानले.
