पाडलोसमध्ये चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला…

साईडपट्टी खचल्याने झाला अपघात : संरक्षक भिंत उभारण्याची मागणी..

⚡बांदा ता.०९-: मडुरा-पाडलोस-न्हावेली मार्गावरील केणीवाडा येथे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याची साईडपट्टी सुमारे तीन फूट खोल खचली. मात्र, टेम्पो चालकाच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला. केवळ खडीकरण व डांबरीकरण करून सार्वजनिक बांधकाम विभाग धन्यता मानते. परंतु धोकादायक साईडपट्टीकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे असे अपघात घडत असल्याचे पाडलोस तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी सांगितले. तसेच मोठा अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


मडुरा येथून पाडलोस मार्गे न्हावेलीच्या दिशेने शुक्रवारी संध्याकाळी मालवाहू टेम्पो जात होता. केणीवाडा डोंगराचीकोण येथे समोरून येणाऱ्या एका चार चाकीला बाजू देताना टेम्पो चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला नेली. परंतु वाढलेल्या झुडपांमुळे साईडपट्टीविना असलेला रस्ता चालकाच्या लक्षात आला नाही. टेम्पो बाजूला जाताच अचानक साईडपट्टी दोन ते तीन फूट खोल कोसळली. सुदैवाने टेम्पो चालकाच्या प्रसंगावधानामुळे हानी टळली. याची खबर न्हावेलीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो चालकाने ग्रामस्थांना दिली. पाडलोस तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, पाडलोस विकास सहकारी सोसायटी संचालक बंड्या कुबल तसेच ग्रामस्थ श्रीधर परब, महादेव नाईक, लक्ष्मण नाईक, सुनील नाईक, सचिन नाईक, लाडू परब, बाळा परब आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षेचे दृष्टीने लाकडे लावली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत तत्काळ उपाययोजना न केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचे महादेव नाईक यांनी सांगितले.
ठेकेदारांच्या कामावर दुर्लक्ष
रस्त्याचे काम करताना संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी प्रत्यक्षात उपस्थित नसतो. केणीवाडा येथील रस्त्याचे काम पावसाळा सुरू झाला तरी सुरू होते. ठेकेदाराने घाईघाईने काम उरकले परंतु धोकादायक साईडपट्टीकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. त्यामुळे ठेकेदारांच्या कामावर अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष झाल्याने असे अपघात घडतात असे सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page