मनसेने प्रशासनाला विचारला जाब..
⚡मालवण ता.१५-: मालवण तालुक्यातील कट्टा पेंडुर येथील ग्रामीण रुग्णालयास पावसाळ्यात गळती लागल्याने रुग्णांची गैरसोय होत असून याबाबत रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्व खबरदारी न घेतल्याने मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांना जाब विचारला. तसेच यावेळी पाचारण केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्यांनाही खडेबोल सुनावत रुग्णालयाच्या स्लॅबची दुरुस्ती न झाल्यास रुग्णांना सा. बां. विभागाच्या कार्यालयात आणून बसवू असा इशारा दिला. शेवटी अभियंत्यांनी येत्या तीन दिवसात गळती बाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
पेंडुर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या स्लॅबला गळती लागल्याने याबाबत आज मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांची भेट भेटली. यावेळी कट्टा गावचे माजी सरपंच सतीश वाईरकर, अभय वाईरकर, रोहित वाईरकर, मयूर फाटक, अजित सावंत, किशोर भोजणे, रोहित चव्हाण आदी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गणेश वाईरकर म्हणाले, ग्रामीण रुग्णालयाच्या स्लॅबला गळती लागल्याने महिला व पुरुष वॉर्ड मध्ये पाणीच पाणी झाले आहे. रुग्णालयातील कार्यालयीन कक्ष तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षातही गळती सुरु आहे. या रुग्णालयाची इमारत जुनी झाली असून स्लॅबच्या देखभालीकडे लक्ष दिले गेलेले नाही. या रुग्णालयाला पत्र्याची शेड करण्यात यावी, अशी मागणी वाईरकर यांनी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना पाचारण करण्यात आले. यावेळी हजर झालेल्या अभियंत्यांना गणेश वाईरकर यांनी रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत अभियंत्यांना धारेवर धरत खडेबोल सुनावले, याबाबत सा. बां. विभागाच्या अभियंत्यांनी येत्या तीन दिवसात स्लॅबचे काम करून गळती दूर करण्याचे आश्वासन दिले.
