कलमठ व जाणवली येथील प्रवाशांची मागणी..
⚡कणकवली ता.२०-: सिंधुदुर्ग विभागाच्या राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कणकवलीतून जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या तरंदळे उड्डाण पुलाच्या सर्विस रोडवरून ये -जा करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत कणकवली एसटी विभागाला कलमठ व जाणवली येथील रामेश्वरनगर, शिक्षक कॉलनी, आदर्श नगर, बँक कॉलनी यांचे मार्फत पत्र देण्यात आलेले आहे. तरीही फक्त कणकवली- देवगड गाडी जाताना एकाच सर्विस रोडने जाते. येताना उड्डाण पुलावरूनच येते. वास्तविक हे दोन्ही सर्विस रोड पुर्ण झालेले असून सर्व लोकल फेऱ्या या सर्विस रोडनेच गेल्या पाहिजेत.अशी मागणी असून यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
एस्टी महामंडळ आधीच डबघाईला आलेले असून अशा प्रकारचा नियोजन शून्य कारभार यामुळे आणखीच तोट्यात जात आहे.तरी एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे त्याचप्रमाणे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी यासाठी एसटी च्या सर्व फेऱ्या तरंदळे उड्डाण पुलाच्या सर्विस रोडवरून नेण्यात याव्यात अशी मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे.
