सिंधूनगरीत साकारतंय अद्यावत कौशल्य विकास केंद्र…

प्रभाकर सावंत: जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा..

ओरोस ता ८
सगळीकडे सर्वात मोठी मागणी असलेल्या गवंडी काम आणि सुतार काम यांचे अद्यावत ज्ञान देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि अर्थ सहाय्यातून ५० लाख रुपये खर्चाचे प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्गनगरी येथे उभे राहत आहे. या प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सावंत बोलत होते. यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सावंत यांनी, संपूर्ण देशभर कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाकडे सध्या कल वाढलेला दिसत आहे. या अनुषंगाने अनेक कौशल्यांवर आधारित छोटे छोटे अभ्यासक्रम आणि योजना सुरू होत आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हे घडत असताना ज्या कौशल्याना जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर मोठी मागणी आहे व त्या प्रकारचे प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी जिल्ह्यात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत अशा सुतारकाम व गवंडीकाम या विषयांचे सहा महिन्यांचे अद्यावत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा पालकमंत्री चव्हाण यांचा मानस होता. पालकमंत्री यांनी हा केवळ मानस न ठेवता या विषयांचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने सिंधुदुर्गनगरी येथे एक अद्यावत केंद्र उभारणीचे काम सुटू केले. या केंद्राचे काम अंतिम टप्यात असून त्याचा येत्या २६ जानेवारी रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे, असे सांगितले.
जिल्ह्यात सामान्य प्रकारचे सुतारकाम आणि गवंडीकाम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु विशेष असे फर्निचर किंवा आधुनिक पद्धतीचे बांधकाम करण्यासाठी कारागीर उपलब्ध नाहीत. जिल्ह्यातील या कारागीर मंडळींना सहा महिन्यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध करून दिले तर त्यांना जास्त मोबदला मिळणारा रोजगार जिल्ह्यात आणि गरज असेल तर जिल्ह्याबाहेर मिळू शकतो.
स्वतःचा व्यवसाय सुद्धा ही मंडळी करू शकतात. असा उद्देश या केंद्र निर्मितीमागे आहे. या केंद्रात तीस तीस प्रशिक्षणार्थ्यांच्या दोन बॅच सुरू करण्यात येणार आहेत. दर सहा महिन्यांनी पुन्हा नवीन प्रवेश होतील. यासाठी पुणे सासवड येथे ‘कॉज टू कनेक्ट’ या संस्थेचे ‘हुनर गुरुकुल’ या नावाने एक केंद्र सुरू असून पालकमंत्री यांनी त्या संस्थेवर या प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. संस्थेचे अनिरुद्ध बनसोड यांनी प्रशिक्षणार्थी निवडीचे काम सुरू केलेले आहे.
जिल्ह्यात अशा विषयांना आकार देणारी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान याबाबत सर्व संस्थांमधील समन्वयाचे काम करत आहेत. कसाल शिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचाही या विषयात सक्रिय सहभाग आहे.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आग्रहाने आणि सौजन्याने जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारच्या अद्यावत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील युवकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा व आपल्या अंगी असलेल्या किंवा आवडीच्या कलेमध्ये पारंगत व्हावे, जेणेकरून त्यांना विशेष अशा व्यवसाय तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हे केंद्र जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रथम सुरू होत असून प्रत्येक तालुक्यात अशी केंद्रे पालकमंत्री यांच्या माध्यमातून लवकरच उभी रहात आहेत, त्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ज्यांना या विषयांचे सहा महिन्यांचे मोफत प्रशिक्षण घेण्याची इच्छा आहे त्या युवकांनी भाजपा कार्यालय,वसंत स्मृती तसेच भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page