महिलावर्गातून समाधान : काम शिवसेनेच्या माध्यमातून झाल्याचा राजू शेटकर यांचा दावा
*💫बांदा दि.१५-:* अनेक वर्षे रखडलेल्या पाडलोस-केणीवाडा नळपाणी योजनेला अखेर मुहूर्त सापडला. भूमिपूजन झाल्याने पाण्यासाठी होणारी महिलांची वणवण थांबणार असून केणीवाडावासियांची तहान आता भागणार असल्याने महिला वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे. केणीवाडा नळपाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच अक्षरा पाडलोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, ग्रा.पं.सदस्य गणपत पराडकर, उर्मिला कोरगावकर, मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक, पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, सिंधु कोकण दुग्ध उत्पादक सहकारी संस्था पाडलोसचे अध्यक्ष अर्जुन कुबल, सचिव आनंद कुबल, माजी ग्रा.पं.सदस्य लिंगाजी पाडलोसकर, ग्रामस्थ दत्ताराम कोरगावकर, श्रीधर परब, महादेव नाईक, सप्रेम परब, अमोल नाईक, समीर कोरगावकर, सुजित परब, निखील परब, भास्कर नाईक आदी उपस्थित होते. एप्रिल, मे व जून महिन्यात केणीवाड्यातील नागरिकांना पाण्याचा दुष्काळ सहन करावा लागतो. वारंवार प्रशासनाकडे मागणी करून याकडे कुणी लक्ष देत नसल्याने महिलांनी घागर मोर्चा काढण्याची तयारीही केली होती. परंतु भूमिपूजन झाल्याने काही काळ पाण्यासाठी वाट पाहत बसलेल्या केणीवाडा ग्रामस्थांना आता लवकरच पाणी मिळणार असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राजू शेटकर म्हणाले की, पाण्यासाठी केणीवाड्यातील महिलांनी अनेकवेळा आपली समस्या मांडली होती. त्यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून नळपाणी योजनेद्वारे सर्वांना पाणी देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे दिलेला शब्द आज आम्ही पूर्ण करत असल्याचे श्री. शेटकर यांनी सांगितले. सदर काम शिवसेनेच्या माध्यमातून होत असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
