मुख्यमंत्री प्रमोद सावंत; किर्तन महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद
⚡बांदा ता.१६-: कीर्तन हा ईश्वरी भक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी ईश्वरी साधना व भक्ती करणे ही काळाची गरज आहे. कीर्तनाच्या रूपातून ज्ञान देण्याचे कार्य हा कीर्तनकार करत असतो. कीर्तन महोत्सवाची कला ही लुप्त होण्याच्या मार्गावर असताना युवा पिढी ही कला व संस्कृती जोपसण्यासाठी कार्यरत आहे हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डोंगरपाल येथे केले.
डिंगणे-डोंगरपाल येथील श्री स्वामी समर्थ मठात आयोजित कीर्तन महोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थापक अवदुतानंद महाराज, माजी सभापती प्रमोद कामत, शीतल राऊळ, मंदार कल्याणकर, श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, डिंगणे माजी सरपंच जयेश सावंत, प्रगतशील शेतकरी राजाराम मावळणकर, विलास सावंत, राजेश सावंत, मिलिंद शेटकर, नावेली सरपंच कालिदास गावस, सर्व मठांचे मठाढीपती महाराज आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी अवदुतानंद महाराज यांच्या हस्ते डॉ. प्रमोद सावंत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विविध मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. तीन दिवसात विविध कीर्तनकारांनी आपली कला याठिकाणी सादर केली. पहिल्या दिवशी युवा उद्योजक विशाल परब यांनी महोत्सवला उपस्थिती दर्शविली होती.
डॉ. सावंत म्हणाले की, आजच्या कलियुगात कित्येकांना व्यसनमुक्ती करण्याचे काम हे मठाच्या मार्फत केले जाते. याठिकाणी युवकांना द्यानाचा मार्ग दाखविला जातो. वेळ सार्थकी लावण्यासाठी ईश्वरी भक्तीचा मार्ग अवलंबीला पाहिजे. ज्ञानदान हे केवळ शाळेतच नाही तर मठ, मंदिरात देखील होते हे आपण दाखवून दिले आहे.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजच्या पिढीला समुपदेशकाची गरज निर्माण झाली आहे. योग्य ज्ञान व संस्कार मिळत नसल्याने पुन्हा संयुक्त कुटुंब पद्धतीकडे वळले पाहिजे. भारताने जगाला वसुदेव कुटुंब पद्धतीचा नारा दिला असून जी २० देशांच्या माध्यमातून संयुक्त कुटुंब पद्धतीचा प्रसार सुरु केला आहे. लोकांचा अध्यात्म व धार्मिक संस्कृतिकडे कल वाढविण्यासाठीच गोवा शासनाने मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा गोव्यात सुरु केली आहे. या यात्रेला देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी डॉ. सावंत यांनी संत सोहिरोबानाथ यांच्या ‘हरी भजना वीण काळ घालवू नको रे..’, अंतरीचा ज्ञानदीवा मालवू नको रे..’ या पंक्तींचा देखील उल्लेख करत याप्रमाणे आचरण करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास सावंत यांनी केले.
