डॉ आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे

भारत भूमी निर्भिड, स्वावलंबी बनेल;सरपंच प्रियांका नाईक यांनी व्यक्त केला विश्वास

बांदा ता.१४-: घटनाकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार आताच्या पिढीने आत्मसात करून मार्गक्रमण केल्यास आपली भारत भूमी ही निर्भीड व स्वावलंबी बनेल. असे प्रतिपादन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे केले.
बांदा आंबेडकरनगर येथील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच श्रीमती नाईक बोलत होत्या. यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, साई काणेकर, प्रशांत बांदेकर, श्यामसुंदर मांजरेकर, रुपाली शिरसाट, देवल येडवे, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये, सोनिया सातार्डेकर, अनुजा देसाई, आदिसह समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच जावेद खतीब म्हणाले की, बाबासाहेब हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी लिहिलेल्या घटनेने व संविधानाने आपणा सर्वाना सर्वाधिकार प्राप्त झाले आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिला आहे. रुपाली शिरसाट यांनी महामानव डॉ. आंबेडकर यांनी समाजाने अज्ञानी न राहता प्रज्ञावान होण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. आंबेडकर यांना उपस्थितांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता बांदेकर हिने केले.

You cannot copy content of this page