⚡मालवण ता.११-: बलाव्यातील रोहिल्याच्या सहायाने गळफास लावून घेत रुपेश जगन्नाथ हरवळकर (वय-४०) रा. उरसा- कारवार या खलाशाने समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुपेश हरवळकर याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण येथील मनीषा जाधव यांच्या बलाव्यावर रुपेश हरवळकर हा खलाशी म्हणून कामास होता. काल दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान बल्याव घेऊन ते समुद्रात मासेमारीस गेले होते. मध्यरात्री तीन वाजण्याच्या दरम्यान रुपेश हरवळकर याने रोहिल्याच्या सहायाने गळफास लावून घेत नांगरासह समुद्रात उडी मारली. हा प्रकार लक्षात आल्यावर नौकेवरील अन्य खलाशांनी त्याला समुद्रातून बाहेर काढत किनाऱ्यावर आणले. त्याला तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू होती.
