शालेय जीवनात मैदानी खेळ महत्वाचे

पोलीस निरीक्षक शामराव काळे

बांदा/प्रतिनिधी
स्पर्धेत टिकायचे असेल तर बौद्धीक क्षमतेबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती देखील तितकीच महत्वाची आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. शालेय जीवनाची प्राथमिक ही पहिली पायरी असल्याने मैदानी खेळांसाठी शाळांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे केले.
येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ चा शालेय क्रीडा महोत्सव येथील खेमराज प्रशाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. काळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र श्री विजेता शरीरसौष्ठवपटू संदेश सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, रिया आलमेडा, सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मैदानावर श्रीफळ वाढवून व क्रीडा प्रतिज्ञा देऊन क्रीडा महोत्सवाचे उदघाटन संपन्न झाले.
संदेश सावंत म्हणाले की, खेळ म्हटला की हार-जीत आहे. त्यामुळे मुलांनी खिलाडूवृत्ती दाखवावी. क्रीडा स्पर्धामध्ये पश्चिमात्य देशांचे वर्चस्व असते. त्या देशात लहानपणापासून मुलांना खेळाचे प्रशिक्षण देण्यात येते. आपणाही या वयातच अभ्यासाबरोबरच खेळाची आवड देखील जोपसावी.
स्वागत निलेश मोरजकर व श्रद्धा नार्वेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे. डी. पाटील यांनी केले. आभार रंगनाथ परब यांनी मानले. यावेळी मुलांनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेत यश मिळविले.
फोटो :-
बांदा खेमराज प्रशाळेच्या मैदानावर क्रीडा महोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी.

You cannot copy content of this page