सिंधुदुर्गनगरी ता ०२ वारंवार विनंती अथवा दंडात्मक कारवाई करूनही जिल्ह्यात सीटबेल्ट व हेल्मेट शिवाय प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागा मार्फत अशा वाहनचालकांवर पुष्पक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यात २०० वाहनचालकांवर गांधीगिरी पद्धतीने कारवाई करण्यात आली. वाहन चालवतांना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे सुरक्षेच्या दृतीने किती महत्त्वाचे आहे, हे आरटीओ राजेंद्र सावंत यांनी पटवून दिले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. जिल्ह्यात सद्या रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरू आहे. यानिमित्त ठिक ठिकाणी वाहन चालकांना नियम समजावून सांगितले जात आहेत. वाहनांची तपासणी करणे, वाहन वाहतुकीसाठी योग्य आहे का, वाहनांची कागदापत्र, हेल्मेट, सीटबेल्ट यांची तपासणी केली जात आहे. १७ फेब्रुवारी पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. दरम्यान या मोहिमेअंतर्गत सोमवारी सकाळी ओरोस येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात गांधी गिरी पध्दतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कारवाईत २०० जणांचा समावेश आहे. सीटबेल्ट व हेल्मेट चा वापर न केल्यामुळे कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यापुढे नियमांचे पालन करा व स्वतःचा जीव वाचवा अशी विनंती वजा सूचना उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आली. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक जविद शिकलगार, संजू केरकर, अभय सामंत, गिरीश धुमाळे, सुनील तळेकर, संतोष धुमाळे, बाळू कानडे, वागमोडे यांनी केली. बॉक्स वाहनचालकांची उडाली भंबेरी..! अपघातात मुख्यत्वे सीटबेल्ट व हेल्मेट चा वापन न केल्यामुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत. हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणाऱ्यांवर दररोज दंडात्मक कारवाई केली तरी बहुतांश वाहन चालक सुधारण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सोमवारी अचानकच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अशा वाहनचालकांना हेरून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि ही बाब आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगितले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून गांधीगिरीचा वापर
