तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी वेधले उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे लक्ष…
⚡सावंतवाडी ता.२५-: मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांना खाजगी बस चालक हायवेवर झाराप किंवा मळगाव येथे सोडत असल्याने आज काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धडक देत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हंटले की, सद्य स्थितीत खाजगी बस चालकांनी प्रवासी भाडे दुप्पट केले आहे. तसेच मुंबई, पुणे वरून येणाऱ्या चाकरमान्यांना पहाटेच्या वेळी झाराप किंवा मळगाव रस्त्यावर उतरवले जात असून, त्याचा नाहक त्रास चाकरमान्यांना होत आहे. त्यामुळे हे रोखण्यासाठी यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी यावर तातडीने कार्यवाही केली जाईल. कोणत्याही चाकरमान्याला त्रास होणार नाही. याची काळजी घेतली जाणार असून, सर्व खाजगी बस चालकांना याबाबत समज देण्यात येईल तसेच त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.
यावेळी शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, रवींद्र म्हापसेकर, बबन डिसोजा, बबलू डिसोजा, आनंद कुंभार, किशोर राणे आदी उपस्थित होते.
