⚡कणकवली ता.२८-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाचे दळवी महाविद्यालय व एनसीसी विभागाच्या वतीने ‘सतीश कथामाला’ या वीर हुतात्मांच्या जीवनावर आधारित आंतरविभागीय महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळेरे माजी उपसरपंच शशांक तळेकर तर अध्यक्षस्थानी श्री.श्रीपाद वेलिंग, समन्वयक, दळवी महाविद्यालय आणि संचालक, मुंबई विद्यापीठ उप-परिसर हे उपस्थित होते.
राष्ट्रासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी, थोर हुताम्यांच्या विस्मरणात गेलेल्या आठवणी पुन्हां जागृत व्हाव्यात, विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देश घडवावा म्हणून श्री.विनायक दळवी यांनी ही नाविन्यपूर्ण संकल्पना महाविद्यालयात रुजवली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेश वंदना करून झाली.
श्री.हेमंत महाडीक (सहाय्यक प्राध्यापक) यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले. “ थोर हुताम्यांच्या विस्मरणात गेलेल्या आठवणींची माहिती सतीश कथामालेतून मिळेल व आठवणी ताज्या राहतील त्यातून प्रेरणा मिळेल” असे ते म्हणाले.
शशांक तळेकर यांनी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले की, ” हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानामुळे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय, हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्री. विनायक दळवी सरांनी महाविद्यालयात सुरू केलेला हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे”.
श्री.श्रीपाद वेलिंग या वेळी बोलतांना म्हणाले कि, विध्यार्थ्यांनी सतीश कथामालेतून असा प्रसंग उभा केला पाहिजेकी तो प्रसंग आपल्या समोर घडतोय असे कथेचे वर्णन त्यांनी केले पाहिजे, तसेच ‘घर घर तिरंगा’ या योजनेत नाव नोंदणी करून घरो घरी तिरंगा फडकला पाहिजे. असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सायली महाजनहिने केले. आभार प्रदर्शन कु. दिप्ती वारीकहिने केले. या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
