कुंपणच शेत खातेय:मनसे कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप
⚡ओरोस ता.१५-: जिल्हा परिषदेकडील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर आळा बसण्यासाठी जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांमध्ये “खांदेपालट” करण्याची गरज असून मागील तीन वर्षांपासून रखडलेली कर्मचारी स्थानांतरण प्रक्रिया राबवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेणार का असा सवाल मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ओरोस येथील आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेत लाड पागे,अनुकंपा अशी बोगस भरती प्रकरण उघड झाली..वॉटर प्युरीफायर खरेदी, संगणक खरेदी, देवगड शिक्षण विभाग भ्रष्टाचार अशी शासन निधी अपहाराची प्रकरण समोर आली त्यातुन नेमकं निष्पन्न काय झालं…नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेतील घोळ उघडकीस आला त्यात कोणावर कारवाई झाली ? शिक्षण विभागाकडील लाखो रुपयांच्या वॉटर प्युरीफायर घोटाळ्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी व वित्त अधिकारी यांच्यावरील फक्त विभागीय चौकशीने अपहारित पैशांची वसुली कशी होणार? देवगड शिक्षण विभागाकडील 2 कोटी 4 लाख रुपयांच्या अपहारीत रक्कमेची नुसत्या एफआयआरने वसुली होणार का? भ्रष्टाचार उघडकीस आलेल्या प्रकरणांमधील दोषी अधिकारी आणि कर्मचारी अद्यपाही त्याच विभागात व त्याच पदावर कार्यरत आहेत ह्यातून जिल्ह्याला कोणीही वाली नसून “कुणीही यावे अन टिचकी मारून जावे” असा विघातक संदेश जिल्ह्याबद्दल मंत्रालय पातळीवर पर्यंत गेलाय.
प्रशासन सर्वच प्रकरणात कारवाईस वेळकाढूपणा करत असून काही जबाबदार वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट प्रवृत्तींना वाचवण्याची धडपड करत आहेत असा आमचा थेट आरोप आहे.त्यामुळे भ्रष्टाचारातून गिळंकृत झालेल्या निधीची वसुली कधी व कशी होणार हा खरा प्रश्न असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे. लाखो करोडो रुपयांचा अपहार केल्याचे उघड होऊन देखील दोषी अधिकारी व कर्मचारी अद्यापही त्याच विभागात व त्याच टेबलावर तळ ठोकून ताठ मानेने पुन्हा भ्रष्टाचार करायला मोकळे सुटणार असतील तर चौकशीचे फार्स तरी नेमके कशाला केलेत अशी सर्वसामान्य जनतेची भावना झालेली आहे ? प्रत्येक प्रकरणात कारवाईसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागत असतील तर असली कुचकामी प्रशासकीय यंत्रणा काय कामाची आहे. मुळात 3 वर्ष एकाच टेबलावर व 5 वर्षे एकाच विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करणेबाबत शासन आदेश आहेत तर मग मागील 2 वर्षात त्यावर कार्यवाही का झाली नाही?जिल्हापरिषदेकडील कर्मचाऱ्यांना विभाग बदल करण्याची तीव्र इच्छा असताना देखील काही हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या कर्मचाऱ्यांसाठी अद्यापही कर्मचाऱ्यांच्या विभाग स्थानांतरणाची फाइल सामान्य प्रशासन विभागात अडकून पडली आहे ती नेमकी कोणाच्या वरदहस्ताने व हितसंबंधांनी? काही निवडक कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे संपूर्ण जिल्हा पारिषदेचे नाव बदनाम होत असून ते वेळीच थांबणे गरजेचे असून जिल्हापरिषदेकडील सर्व विभागात “खांदेपालट” केल्याशिवाय भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर आळा बसणार नाही अशी रोखठोक भूमिका मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे.
