आंतरजिल्हा बदलीचा मार्ग झाला सुकर

शिक्षक भारतीच्या लढ्याला यश;श्री शरद पवार व आम.कपिल पाटील यांची यशस्वी शिष्टाई

ओरोस ता.०२-:* आंतरजिल्हा शिक्षक बदलीसाठी १० टक्के रिक्त पदांची असलेली अट शासनाने रद्द केली आहे. या अटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली रखडल्या होत्या. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर संघटनेचे नेते आ कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व ग्रामविकामंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी यशस्वी चर्चा केल्यानंतर शासनाने ही अट रद्द केली आहे.

परिणामी जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली पात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा प्रश्न मिटला आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त पदांची टक्केवारी १० टक्के पेक्षा जास्त असल्याने शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीस शासनाने मान्यता दिली नव्हती .

आंतरजिल्हा बदलीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गने गेली दोन वर्षे सतत प्रयत्न केले होते. शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकास सचिव, ग्रामविकास मंत्री यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश होण्यासाठी निवेदन, प्रत्यक्ष भेटी, व्हिडिओ कॉन्फरन्स याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

तसेच जिल्हा परिषद समोर एकदिवसीय धरणे आंदोलने व लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते. तथापि हा प्रश्न सुटत नसल्याने शिक्षक भारतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षक संघटनाच्या इतिहासात प्रथमच सलग १० दिवस अभूतपूर्व धरणे आंदोलन केले याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाशी पत्रव्यवहार केला होता. तसेच ग्रामविकास विभागाचे उपसचिव व आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष नवनाथ गेंड जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व शिक्षक भारतीचे शिष्टमंडळ यांची यशस्वी चर्चा झाली होती. शिक्षक भारतीचे शिष्टमंडळ, कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

या प्रयत्नांचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ,आमदार कपिल पाटील यांची बैठक झाली.या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली त्यावेळीच आंतरजिल्हा बदली मध्ये १० टक्के पेक्षा जास्त रिक्त जागा असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यश म्हणून १ जून २०२२ रोजी शासनाने आंतरजिल्हा बदलीमध्ये जिल्ह्यांचा समावेश होण्याबाबत परिपत्रक निर्गमित केले आहे .

यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ते २० वर्षे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या सर्व आंतरजिल्हा बदली ग्रस्त शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी शिक्षक भारती व आमदार कपिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांनी संघटनेच्या कार्यपद्धतीने प्रभावित होवून यापुढे शिक्षक भारतीला पाठिंबा देणार जाहीर केले आहे.

आंतरजिल्हा बदली या अभूतपूर्व लढ्याला यश मिळण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार कपिल पाटील ,राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड, सुभाष मोरे, संजय वेतुरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व तालुका कार्यकारणी व एकजूट दाखवून शिक्षक बदली बांधव यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याबद्दल शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व सचिव अरुण पवार यांनी दिली आहे

You cannot copy content of this page