पुढील १० दिवस अटकेपासून संरक्षण;न्यायालयात शरण जाण्याचे आदेश
कणकवली ता.०७-:* जिल्हा बँक निवडणूकीतील सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या श्रीधर सावंत यांनी अर्ज दाखल केला होता.सुप्रीम कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत त्यांनी दहा दिवसांत ट्रायल न्यायालयात शरण जावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची माहिती ॲड.राजेंद्र रावराणे यांनी दिला आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणात माजी जि.प. अध्यक्ष गोट्या सावंत हे संशयित आरोपी आहेत.त्यांचा जिल्हा ,उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता.त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गोट्या सावंत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.त्यावर सुनावणी झाली, त्या सुनावणीत ॲड.राजेंद्र रावराणे ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.या सुनावणीत सरकारी पक्ष व आरोपींच्यावतीने बाजू मांडण्यात आली आहे. त्यानुसार गोट्या सावंत यांना दहा दिवस पोलिसांना अटक करता येणार नाही. मात्र त्यांनी स्थानिक न्यायालयात शरण जाऊन जामीनाची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्याचे ॲड.राजेंद्र रावराणे यांनी सांगितले.
