कोरोनामुळे बंदी असल्याने शासनाने दिलासा देण्याची करणार मागणी
मालवण (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या पर्यटन स्थळे बंदच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी, ऍग्रो ,निसर्ग ,जलक्रीडा पर्यटनासाठी साठी येणारे पर्यटक येणे पूर्ण पणे बंद झाले असून पर्यटन ठप्प होऊन येणाऱ्या काळात या व्यवसायातील लोकांसमोर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना दिलासा देण्यासंबंधी शासनाने विचार करावा या मागणी साठी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग तर्फे बुधवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्षे ठप्प असलेला जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय गेल्या दोन महिन्यात थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर येत असताना ओमिक्रोन व कोरोना च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. जे पूर्णपणे चुकीचे असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निर्बंधासह चालू करण्यात यावीत. तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, जलक्रीडा व्यवसाय कोविड निर्बंधाचे पालन करून सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत जेणेकरून कोविड नियमावलीचे पालन करून पर्यटक जिल्ह्यात येतील अशी विनंती पर्यटन महासंघा तर्फे करण्यात येणार आहे. सदर आदेशामध्ये बदल न झाल्यास या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या टूर गाईड, वाहन चालक, हॉटेल, रेस्ट्रॉरंट, रिक्षाचालक, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा व्यावसायिक सिंधुदुर्ग किल्ला होडी चालक, होमस्टे धारक याच्यावर उपासमारीची व उध्वस्त होण्याची वेळ येणार आहे. स्थानिक प्रशासन व राज्य सरकार कडून कुठलीही आर्थिक मदत स्थानिक पर्यटन व अन्य व्यावसायिकांना मिळालेली नाही. आजही पर्यटन व्यावसायिक या कर्जाच्या बोजातून बाहेर येण्यासाठी व्यावसायिक पातळीवर प्रयत्न करत आहे. यावेळी पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने सदर विषयी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहितीही विष्णु मोंडकर दिली आहे.
