*आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत ग्वाही
*⚡सावंतवाडी ता.२५-:* महापुरात झालेली नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली असून तिचे वाटप सुरू आहे. मात्र अद्याप निसर्ग वादळ व अतिवृष्टीमुळे शेती बागायतीची २०१९-२० मधील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात झालेली २ कोटी ३५ लाख रुपयांची नुकसान भरपाई अजूनही प्रलंबित आहे, ती शासन स्तरावरून मंजूर करून घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून ती आपण मंजूर करून घेणार, अशी ग्वाही आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार केसरकर म्हणाले, आपण प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील तहसीलदार यांची आज बैठक घेऊन २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षातील नैसर्गिक वादळ, तौक्ते वादळ, अतिवृष्टी, महापूर या काळातील नुकसान भरपाई बाबतचा आढावा घेतला आहे, हल्लीच वादळ व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या काळातील नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे मात्र निसर्ग वादळ व सन २०१९-२० मधील नुकसान भरपाई अजूनही बाकी आहे. दोडामार्ग तालुक्यात १ कोटी ४० लाख, सावंतवाडी तालुक्यात ४५ लाख, वेंगुर्ले तालुक्यात ४८ लाख ८१ हजार रुपये मिळून दोन कोटी ३५ लाख रुपये मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत,आपण मंत्री, सचिव पातळीवर नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे असे केसरकर यांनी सांगितले.
