आनंदव्हाळ येथे आंबा पुनरुज्जीवन प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रम
*⚡मालवण ता.२३-:* जून्या आंब्याच्या झाडांपासून कमी उत्पादन मिळते. ज्या बागांमधली झाडं खूप उंच वाढली आहेत, ज्या बागांमध्ये फवारणी, फळांची काढणी इत्यादी कामे निटपणे करणे अवघड झालं आहे तसेच, शाखीय वाढ अत्यंत घट्ट झाल्यामुळे सूर्यप्रकाश झाडातील आतील भागापर्यंत पोहोचत नाही. अशा बागेतील झाडांचे टप्प्या-टप्प्याने पुनरुज्जीवन करणे फायद्याचे असल्याचे मत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लेचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. मिथिलेश सणस यांनी व्यक्त केले. आनंदव्हाळ गोवेकरवाडी येथील शैलेश गोवेकर यांच्या बागेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य आधरित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत आंबा पुनरुज्जीवन प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंदव्हाळ उपसरपंच शैलेश भोसले, कातवड उपसरपंच गणेश चव्हाण, शेतकरी सल्ला समिती सदस्या भाग्यश्री चव्हाण, कृषि पर्यवेक्षक सिताराम परब, कृषि सहाय्यक धनंजय गावडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक मालवण निलेश गोसावी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिनाथ चव्हाण, श्रीनाथ निकम, विजय ढोलम, प्रभाकर सावंत, सुजय घाडी आदींनी सहकार्य केले. यावेळी कातवड, आनंदव्हाळ, कुंभारमाठ, देवली, वाघवणे, नांदरुख येथील शेतक-यांनी प्रशिक्षणास उपस्थिती दर्शवली.
