इनोव्हामधील सात प्रवासी जखमी;एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला
*⚡कणकवली ता.१७-:* मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून कोल्हापूरहून गोव्याला जात असलेली इनोव्हा व गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर ही दोन्ही वाहने कणकवली नजीकच्या महामार्गावरील गडनदी पुलानजीकच्या वळणावर रविवारी सकाळी ९ वा. सुमारास परस्परांना धडकली. या अपघातात इनोव्हामधील सातही प्रवासी जखमी झाले. मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पुलानजीक चौपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. परिणामी तेथे वाहने एकाच लेनवर येतात. त्याच कारणास्तव हा अपघात घडला. सुदैवाने इनोव्हामधील एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात कार्तिक अशोक खोत (१२), दत्तात्रय आनंदा खोत (४०), बाबुराव शामराव खाटकर (५३), चैतन्य दत्तात्रय खोत (१२), चैताली दत्तात्रय खोत (१४), मनिषा दत्तात्रय खोत (३३, सर्व रा. बाजारभोगवत, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), चालक प्रदीप दिगंबर पोवार (३४, करवीर – कोल्हापूर) हे जखमी झाले.अपघातानंतर नागरीक, महामार्ग विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.मुंबई गोवा महामार्गवरील मिडल कट अपघाताला निमंत्रण ठरत आहेतच त्याच जोडीला गडनदी पुलानजीकचे महामार्गाचे रखडलेले काम अपघाताला कारणीभूत ठरू लागले आहे.याठिकाणी वारंवार अपघात होत असून गडनदी पुलाकडील हे वळण दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे. .