*💫बांदा दि.०४-:* मडुरा रास्त भाव धान्य दुकानातून वितरीत केलेल्या धान्यात रेती व कचरा आढळून आला होता. कोरोना काळात मिळत असलेले धान्य प्रशासनाने चांगल्या दर्जाचे द्यावे, कोणत्याही ग्राहकाला निकृष्ट धान्य वितरित करू नये यासाठी आपण तहसीलदारांचे लक्ष वेधले होते. यापाठीमागे कोणतेही राजकारण किंवा कोणावरही आरोप केलेले नसून सर्वांनी धान्य तपासूनच घ्यावे, असे आवाहन मडुऱ्यातील मोहन गवस यांनी केले आहे. दरम्यान, मडुरा विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष परब यांनी मडुरा रास्त भाव धान्य दुकानावर एका ग्राहकाने निकृष्ट धान्याबाबत केवळ राजकीय आकसापोटी बिनबुडाचे आरोप केल्याचे म्हटले होते. याला प्रत्युत्तर देत श्री. गवस यांनी कोणीही राजकारण करू नये असे सांगितले. धान्यात मिळालेला कचरा व रेतीची चेअरमन संतोष परब यांनी निदान पाहणी करणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही. तसेच एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या धान्याबाबत आवाज तर उठवला मात्र त्यांनीही पाहणी केली नाही. त्यामुळे कोणीही राजकारण न करता ग्राहकांना चांगल्या दर्जाचे धान्य कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मोहन गवस यांनी केले आहे.
निकृष्ट धान्य दाखविण्यामागे कोणतेही राजकारण नाही : मोहन गवस
