वाहनचालकांनी वाहने त्वरित हटवावीत; अन्यथा आरटीओच्या मदतीने टोव्हिंगची कारवाई..
⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरातील नरडवे नाका येथील उड्डाणपूलाखाली उभी करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली आहे.
उड्डाणपूलाखाली वाहनांची अनियमित पार्किंग होत असल्याने सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांवर परिणाम होत असून परिसरातील सुशोभीकरण आणि नियोजनात अडथळे निर्माण होत आहेत. याची दखल घेत नगरपंचायतीने संबंधित वाहनचालकांना आपली वाहने तात्काळ हटविण्याचे आवाहन केले आहे.
मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, सूचना देऊनही वाहने हटविण्यात आली नाहीत तर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) प्रशासनाच्या सहकार्याने संबंधित वाहने टोव्ह करून कारवाई करण्यात येईल. त्यामुळे वाहनचालकांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आपली वाहने त्वरित हटवावीत, असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
