एसआरएम कॉलेज आणि ऑलटीम कंपनीत सामंजस्य करार:’दीक्षारंभ’ कार्यक्रमातून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत..
⚡कुडाळ ता.११-: विद्यार्थ्यांचं करियर कधी सुरु होतं ? पदवीधर झाल्यांनतर कि पहिला जॉब मिळाल्यांनतर ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे निदान संत राऊळ महाराज महाविद्यलयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तरी नाही अशीच आहेत. कारण या प्रथम वर्षात प्रवेश विद्यार्थ्यांला आता नोकरीची हमी आणि संधी निर्माण झाली आहे. त्यासंबंधीचा एक समजंस्य करार संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि ऑलटीम कंपनी यांच्यात आज झाला. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ या स्वागत सोहळ्याचे आज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आलं होते. त्यानिमित्ताने हा सामंजस्य करार करण्यात आला. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे संत राऊळ महाराज महाविद्यालय हि जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शिक्षणासोबतच नोकरीची संधी सुद्धा निर्माण झाली आहे, त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी कंपनीच्या वतीने या उपक्रमाबाबत सादरीकरण देखील करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणे आणि त्यांना महाविद्यालयाची शिस्त, शैक्षणिक वातावरण व विविध उपक्रमांची ओळख करून देणे या हेतूने येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात या दीक्षारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर कमशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट, ऑलटीम कंपनीचे चेअरमन बिजल मेहता, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, प्रमोद पेडणेकर, अविनाश तळेकर, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ऑलटीम कंपनीचे बिजल मेहता आणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांच्या विद्यार्थ्यांना शिकत असतानाच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या करारावर सह्या करण्यात आल्या. त्यांनतर प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून या उपक्रमबद्दल माहिती दिली. डॉ. सुरवसे म्हणाल्या, २०२३ पासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली. त्यानुसार विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, व जॉब ट्रेनिंग अशा गोष्टी कराव्या लागतात. ग्रामीण भागात या गोष्टी कशा शक्य आहेत, असा प्रश्न बहुतेक महाविद्यालयांना भेडसावतो. त्यासाठी ऑलटाइम कंपनीच्या बिजल मेहता हे पुढे आले आहेत. त्याच्या कंपनी सोबत महाविद्यालयचा सामंजस्य करार झाल्याने आता प्रथम वर्षात प्रवेश करणारे विद्यार्थी शिकत असतानाच नोकरी ऑलटाइम कंपनीत नोकरी सुद्धा करू शकणार आहेत. त्यासाठी कॉलेजमध्ये एक तंत्र प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. विद्यार्थी फायनान्स, कन्टेन्ट क्रियेटर, कन्टेन्ट रायटर, सॉफ्टवेअर अशा त्यांच्या आवडीनुसार जॉब करू शकणार आहेत. त्याचे त्यांना पैसे देखील मिळणार आहेत. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर विद्यार्थी पदवी घेतल्यानंतर त्या कंपनीसोबत पुढे काम सुद्धा करू शकणार आहे. विद्यार्थी आणि पालक यांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सुरवसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अरविंद शिरसाट म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी आज पासून एक नवीन पर्व सुरु होत आहे. या वयात अनेक मोह समोर असतात, ते मोह टाळणे गरजेचे आहे. चांगले मित्र जोडा. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचा फायदा घ्या. चांगले करियर घडवा असे आवाहन श्री. शिरसाट यांनी केले.
ऑलटीम कंपनीचे चेअरमन बिजल मेहता आणि त्याच्या सहकाऱ्यानी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे हा उपक्रम कसा राबविला जाणार आहे ते सांगितले. कंपनीचे सीईओ सिद्धार्थ दास, सीटीओ सूर्या कट्टकम, व्ही.पी. ग्रँड डिसोजा, प्रग्या राऊत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र ठाकूर, डॉ. कमलाकर, प्रा. सबा शेख यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि नागरिक उपस्थित होते.
