कृषी कार्यानुभवासाठी उद्यान महाविद्यालयाचे विद्यार्थी पाडलोसमध्ये दाखल…

⚡बांदा ता.२०-:
उद्यानविद्या शिक्षणासोबत ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी उद्यान महाविद्यालय, मुळदे येथील विद्यार्थ्यांचा गट कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पाडलोस गावात दाखल झाला आहे. पुढील सहा महिने हे विद्यार्थी गावात वास्तव्यास राहून शेती, बागायती पिके, ग्रामीण विकास तसेच सामाजिक जीवनाचा अभ्यास करणार असल्याची माहिती पाडलोस उपसरपंच राजू शेटकर यांनी दिली.
या कार्यक्रमात सातारा, बारामती, धाराशिव, राजस्थान, अकोला आणि अहिल्यानगर येथील विविध भागांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यात कुंज घनवट, प्रसाद जगताप, प्रसाद भोसले, सौदागर कांबळे, भुपेंद्र घांची, यश भटकर आणि साईराज पवार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील शेती व्यवस्थापन, स्थानिक पीकपद्धती आणि ग्रामविकास योजनांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी पाडलोस ग्रामपंचायतीला भेट दिली.
यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर व उपसरपंच राजू शेटकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंचांकडे सुपूर्द केले. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी गावातील पारंपरिक शेती पद्धती, बागायती पिकांचे व्यवस्थापन, महिला बचत गटांची कार्यपद्धती तसेच ग्रामविकास योजनांची माहिती जाणून घेणार आहेत.

ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गावातील विविध विकासकामांची माहिती दिली. ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आधुनिक शेती व्यवस्थापन समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

फोटो——–
पाडलोस : सरपंच सालोनी पेडणेकर यांना पत्र देताना विद्यार्थी. सोबत उपसरपंच राजू शेटकर.

You cannot copy content of this page