स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर…

जिल्ह्यातील १७ गावांतील सर्व कुटुंबांची स्व गणना पूर्ण
प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून घडला आदर्श:वेंगुर्ल्यातील मूठ गाव ठरले राज्यातील पहिले १०० टक्के स्वगणना पूर्ण करणारे महसुली गाव..

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१०-:
स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत राज्यातील पहिले महसुली गाव म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हे यश प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ गावांमध्ये सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण झाली असून, जिल्ह्याने राज्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्यामुळे मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाले.

गावागावांत महसूल यंत्रणा, ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि स्थानिक स्वयंसेवक यांनी संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवली. नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवत स्वगणना प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे अल्पावधीतच अनेक गावांतील सर्व कुटुंबांची स्व गणना पूर्ण झाली आहे.
सामूहिक सहभाग, जबाबदारीची जाणीव आणि प्रभावी नियोजन यांच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, हे या मोहिमेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

तालुकानिहाय स्वगणना पूर्ण झालेल्या गावांची संख्या पुढीलप्रमाणे :

कुडाळ तालुका – कांडरगाव
कणकवली तालुका – उपनगर व नवानगर, वेंगुर्ला तालुका – मूठ,
वैभववाडी तालुका –ग्रामपंचायत निमअरुळे (निमअरुळे, माईंनकरवाडी, कुंभारवाडी व बौध्दवाडी),
दोडामार्ग तालुका – फोंड्ये,
देवगड तालुका – शेरिघेराकामते,मोरवे,
सावंतवाडी तालुका – पडवे, उडेली, दाभील ,
मालवण तालुका – कोळंब, मसुरे, पेंडुर, पोइप, आचरे आणि श्रावण या गावांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही यशस्वी वाटचाल राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भारत सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना होत आहे. याद्वारे सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे.
सिंधुदुर्गचा आदर्श घेत इतर जिल्ह्यांनी देखील गावांची १००% स्व-गणना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील इतर गावांनी देखील स्व-गणना पूर्ण करावी, असे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
०००००००

You cannot copy content of this page