वाढदिवसाच्या पैशातून केले
त्रिंबक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी दिविजा वृद्धाश्रमात अन्नदान..
⚡मालवण ता.०४-:
अवास्तव खर्चातून वाढदिवसाचा आनंद मिळतो असे नाही तर साधेपणाने वाढदिवस साजरा करत वाचलेल्या पैशातून वंचितांना दानधर्म केल्यास जो आनंद मिळतो तो प्रेरणादायी असतो. याचा आदर्श
त्रिंबक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च न करता साठलेल्या पैशांतून असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अन्नदानासोबत दैनंदिन गरजा भागविणा-या वस्तू भेट देत अनोख्या उपक्रमातून केला.
त्रिंबक ग्रामपंचायत येथे सरपंच ,सदस्य तसेच कर्मचाऱ्यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जात होत. मात्र दरवेळी होणार सेलिब्रेशन मनाला समाधान देत नव्हते. याबाबत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आशिष बागवे यांनी वाढदिवसाच्या पैशातून अनाथाश्रमात अन्नदान करण्याची कल्पना मांडली. ती सर्वानी उत्स्फूर्तपणे मान्य करत त्याप्रमाणे साजरा करायचे ठरले. त्या प्रमाणे शुक्रवार 3 एप्रिल रोजी सरपंच असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात संपूर्ण ग्रामपंचायत जात वृद्धाश्रमातील आजी आजोबांशी गप्पा मारत त्याची आस्थेने विचारपूस करत दुपारी अन्नदान केले.
यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर. उपसरपंच सौ सुचिता घाडीगावकर, सदस्य आशिष बागवे, सौ नेहा वेंगुर्लेकर,सौ संतोषी सावंत, सौ सपना तेली,सागर चव्हाण, रोहित त्रिंबककर,ग्रामविकास अधिकारी माधुरी कामतेकर, कर्मचाऱी विशाल मेस्त्री ,ग्रीष्मा बागवे, अश्मी वर्देकर,विश्वनाथ सुतार आदी उपस्थित होते. दिविजा वृद्धाश्रमाचे संदेश शट्ये,समिर मिठबांवकर यांनी त्यांचे स्वागत केले.
त्रिंबक ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमातून वृद्धाश्रमातील आजीआजोबांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य खुलले होते.
