मालवण (प्रतिनिधी) तौक्ते चक्रीवादळामुळे देवबागमधील विहिरींचे पाणी खारे होऊन आठवड्याभरापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना देवबागच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेते, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेड्डीवार यांच्या ताफ्या समोर एका ग्रामस्थाने पाण्याच्या रिकामी घागरी आडव्या ठेवून रस्ता अडवून आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी गाडीतून उतरून घागरी बाजूला करत रस्ता मोकळा केल्याने मंत्री महोदय त्या ग्रामस्थाचा प्रश्न न जाणून न घेताच रवाना झाले. तौक्ते चक्रीवादळानंतर मालवण तालुक्यातील देवबागमध्ये आठवड्या पासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी खारे बनले असूनही येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. याठिकाणी मंत्री आणि पुढारी येतात, पण ग्रामस्थांच्या व्यथा वेदना समजून घेत नसल्याने येथील रुक्मांगत मुणगेकर या ग्रामस्थाने शनिवारी सकाळी देवबागच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेते, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेड्डीवार यांच्या ताफ्या समोर पाण्याच्या रिकामी घागरी आडव्या ठेवून रस्ता अडवला. रस्ता रोखल्याने मंत्री गाडीतून उतरून आपला प्रश्न जाणून घेतील, अशी अपेक्षा श्री. मुणगेकर यांना होती. मात्र अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे पोलीस प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. यामुळे स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी स्वतः गाडीतून उतरून मुणगेकर यांना बाजूला करत रस्ता मोकळा केला. यानंतर श्री. मुणगेकर यांचे म्हणणे ऐकून न घेता ना. वडेड्डीवार येथून मार्गस्थ झाले. गावात आठ दिवस पाणी नाही, त्यामुळे मंत्र्यांनी निदान आमचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया श्री. मुणगेकर यांनी यानंतर व्यक्त केली. गावात आठ दिवस पाणी नाही, मग आम्ही करायचं काय ? असा सवाल यावेळी सौ. रुपाली मुणगेकर यांनी यावेळी केला.
घागरी रस्त्यावर ठेवत पुनर्वसन मंत्र्याचा देवबाग येथील नागरिकांनी अडवला रस्ता
