⚡कुडाळ ता.०६-: बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली येथील सेवानिवृत्त रोखपाल आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या आजीव सदस्या उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच नीलम कंट्रीसाईड कणकवली येथे संपन्न झाला. हे पुस्तक विघ्नेश पुस्तक भांडार कणकवली यांनी प्रकाशित केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए आय बी इ ए कोल्हापूर झोनचे अध्यक्ष संतोष रानडे हे होते. प्रमुख मान्यवर म्हणून साहित्य प्रेमी प्रसाद घाणेकर, निवृत्त भारतीय स्टेट बँक अधिकारी, एकनाथ वायंगणकर, माजी शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे,सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा प्रदीप ढवण हे उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांचे सदस्य आणि धानजी कुटुंबीयप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक द.शि.
हिर्लेकर गुरुजी यांच्या शुभहस्ते वृक्षपूजन करून झाला. त्याचप्रमाणे प्रमुख मान्यवर आणि धानजी कुटुंबीयांच्या हस्ते आपली दैवते श्री देव वेतोबा आणि परमपूज्य भालचंद्र बाबांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
माधव गावकर, संगीततज्ञ यांनी सुश्राव्य असे शारदास्तवन म्हटले. प्रसाद घाणेकर यांच्या हस्ते “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचे दिमाखदाररीत्या प्रकाशन झाले. प्रसाद घाणेकर यांनी आपल्या मनोगतात उज्ज्वला धानजी यांचे पुस्तक हे एक प्रकारचे देखणे आत्मचरित्रच झाले असून त्यांच्या आयुष्याचा प्रवास पहाता ते एक व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शकच पुस्तक ठरले आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे, असे प्रतिपादन केले.
एकनाथ वायंगणकर यांनी उज्ज्वलाच्या मनात एखादी गोष्ट करावी असे आले की ते करण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत आणि जिद्द लहानपणापासूनच आम्ही बघत आल्यामुळे आजचे पुस्तक ही त्याची फलश्रुती आहे आणि त्याने आम्ही खूप आनंदित झालो आहोत, असे सांगतानाच आजचा हा दिवस पहावयाला तिचे आई बाबा हवे होते अशा भावना व्यक्त केल्या.
रामचंद्र आंगणे यांनी मॅडम जरी बँकेत नोकरी करत असल्या तरी त्यांचा कोकण मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला या संस्थातील
साहित्यिक सहभाग हा नेहमीच लक्षणीय आणि मनोवेधक असायचा असे सांगितले. कोरोना काळातील शंभरच्या वर ऑनलाईन कार्यक्रमातील लेखिकेचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना रानडे सर यांनी संबोधित केले की ऐंशीच्या दशकात एसएससीला विशेष प्राविण्य श्रेणी मिळून सुद्धा विज्ञान शाखेकडे न वळता कला शाखेकडे प्रवेश घेऊन लेखिकेने आपले साहित्यप्रेम खरे तर त्या टप्प्यावरच नक्की केले होते .विवाह उत्तर आयुष्यात आणि बँकिंग सेवेत स्थिरस्थावर झाल्यानंतर अंतरंगात जपून ठेवलेले साहित्य आणि त्याचे वेगवेगळे पैलू लेखिकेने आचरणात आणले. सूत्रसंचालन,काव्य, कथा, साहित्य अशा अनेक मार्गाने लेखिका साहित्यसेवा करीत आहे.
“लेखिकेला समजून घेताना” या सुंदर मुलाखतीचे संवादकर्ते प्रसाद घाणेकर यांनी कौटुंबिक क्षेत्रातील वावर यासाठी चंद्रशेखर धानजी, तर बँकिंग क्षेत्रातील वावर यासाठी पूर्वा मराठे आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील वावर यासाठी आरती वायंगणकर यांच्याशी संवाद साधून कार्यक्रमात अधिकच रंग भरला.
सुरेश ठाकूर गुरुजी यांनी उज्ज्वला धानजी यांची आठवणींच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाची निर्मिती यावर प्रकट मुलाखत घेतली. बँक ऑफ महाराष्ट्र मधील सेवा, कौटुंबिक गोष्टी, विविध उपक्रम यांची सांगड घालून केलेले लेखन यावर दिलखुलासपणे संवाद साधला आणि उज्ज्वला धानजी यांनी देखील त्या प्रश्नाला सहज सुंदर अशी उत्तरे देऊन हा संवाद अधिकच देखणा केला.
आठवणींच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाची निर्मितीत माझा एकटीचा सहभाग नसून माझ्या बँक ऑफ महाराष्ट्र मधील सर्व कर्मचारी, मित्र-मैत्रिणी, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक मंडळी, माझे सासर आणि माझे माहेर यांनी वेळोवेळी शुभेच्छा, प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केल्यामुळेच ही अक्षरसेवा माझ्या हातून घडली असे आपले साहित्यऋण त्यांनी व्यक्त केले.
विजय शेट्टी यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे लेखन कार्य घडून निश्चित असा वाचक वर्ग मिळाला याची कृतज्ञता उज्ज्वला धानजी यांनी व्यक्त केली.
तसेच कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखा ,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या सहवासाने माझे हे लेखन अधिकच सुकर झाले आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला धानजी कुटुंबीय आणि धानजी मित्रपरिवार यांची लाभलेली उपस्थिती कार्यक्रमात रंगत आणीत होती.
या कार्यक्रमाला कोमसाप मालवण शाखा, साने गुरुजी कथामाला आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश ठाकूर गुरुजी अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखा यांनी केले. तर कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर सर यांनी केले. आभार प्रदर्शन वैष्णवी शिवम धानजी यांनी केले.
उज्ज्वला धानजी यांच्या”आठवणीच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचे प्रकाशन…
