रामेश्वर संस्थानच्या गणपतीला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप…

विसर्जन मिरवणूकीला भाविकांचा लोटला जनसागर..

⚡मालवण ता.०५-:
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेच्या विघ्नहर्त्याला शनिवारी ३९ दिवसांनी भावपूर्ण वातावरणात सायंकाळी उशिरा आचरा समुद्र किनारी विसर्जन करत निरोप देण्यात आला आणि गेले ३९ दिवस विविधांगी कार्यक्रमानी नटलेल्या या गणेशोत्सवाची सांगता झाली.

एकोणचाळीस दिवस चाललेल्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते. यात किर्तन,दशावतार, फुगडी स्पर्धा, डबलबारी भजनाचे सामने, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, व्हरायटी शो,आर्केस्ट्रा, आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. शनिवारी दुपारी गणपती विसर्जन मिरवणूक रामेश्वर मंदिर येथून पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात निघाली. आचरा तिठा,बाजारपेठ मार्गे सायंकाळी गाउडवाडी येथून श्री देव चव्हाटा येथे पोहोचली तेथून पारंपारीक पद्धतीने पिरावाडी ग्रामस्थांनी गणपती सायंकाळी उशिरा आचरा समुद्र किनारी नेत महाआरती करुन मावळत्या सुर्याच्या साक्षीने बाप्पाला निरोप देण्यात आला. मिरवणूकीत जय भवानी म्युझिकल बॅंजो पथक बोरीवली स्वराज्य ढोल पथक, पिरावाडी महिला ढोलपथकाच्या साथीने पिरावाडी चव्हाटा येथून समुद्र किनारी नेण्यात आली. ठिक ठिकाणी भाविकांनी तोरणे, रांगोळी काढत, फुलांचा वर्षाव करत गणरायाचे स्वागत केलेहोते.आचरा वासियांतर्फे मिरवणूकीत सहभागी भाविकांसाठी थंड पाणी, लाडू मोदकाचे वाटप केले जात होते.आचरा तिठा येथे विविधांगी कवायतींनी या मिरवणूकीत रंगत आणली होती.

सायंकाळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषात साश्रू नयनांनी पिरावाडी
येथील समुद्रात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूकीत भाविकांनी अलोट गर्दी केली होती.आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी मिरवणूकीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी आढाव यांनीही या वेळी भेट दिली होती.

You cannot copy content of this page