पालकमंत्री नितेश राणे: विरोधकांकडून लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांची डोकी भडकवण्याचे काम सुरू..
⚡सिंधुदुर्गनगरी ता ३-: शक्तिपीठ महामार्ग संदर्भात येथील लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांची डोकी भडकवण्याचे काम विरोधकांचे सुरू आहे.हे मी कदापी खपून घेणार नाही.असे सांगतानाच शक्तिपीठ महामार्ग होताना जो यामध्ये बाधित होईल अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. आत्ता असलेला जो शक्तिपीठ महामार्गाचा प्लॅन आहे तो सिंधुदुर्गसाठी उपयोगाचा नाही,त्यामुळे हा प्लॅन आम्ही काही करून बदलणारच, शक्तिपीठ मार्ग लोकांच्या हितासाठी आहे.तो मार्ग गोव्याकडे न जाता झिरो पॉईंट किंवा माळगांवकडे जाईल असे पाहणार आहे.असे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज गुरुवारी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,शक्तिपीठ संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे.तसेच कालच मी एमएसआरटीसी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी ही माझी चर्चा झाली आहे. सर्वात प्रथम सिंधुदुर्गच्या आणि त्या भागातल्या ज्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय त्यांना मी स्पष्ट भूमिका राज्य सरकारची सांगेन की, प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच हा महामार्ग होणार आहे. खासदार राणे साहेब आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये दोन आठवड्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एमएसआरडीसी आणि अन्य लोकांना सांगितली आहे . लोकांना विश्वासात घेतल्यानंतर निर्णय घेऊ. आम्हाला पर्यायी दोन-तीन मार्ग दाखविण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत . कारण आता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमचं बांधा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते आणि म्हणून आम्ही सांगितलं की या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत. हा महामार्ग जर गोव्यात निघत असेल तर त्याचा महाराष्ट्राला काय फायदा, सिंधुदुर्गाला याचा फायदा व्हावा म्हणून आत्ता असलेला जो काही प्लॅन आहे तो आम्ही १०१ टक्के बदलणारच आहे. त्यासंबंधी कॅबिनेट मध्ये पण आमची चर्चा झाली.संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आणि नंतर जे पर्यायी दोन मार्ग सुचवलेले आहेत त्यानुसार तो झिरो पॉईंट किंवा मळगाव या काही भागांमध्ये तो शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो, रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल .त्यामुळे कोणाचेही मोठे नुकसान होणार नाही. काही लोकांची शेती अगर जमीन जात असेल त्याच्याही योग्य पद्धतीने मोबदला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो दिला जाईल. पण आत्ता जो करंट प्लान आहे तो एकशे एक टक्के आम्ही बदलणार आहोत. तो आताचा प्लॅन राहणार नाही, दीपक केसरकर साहेबांनी पण कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. आमची जी काही भूमिका आहे तीच भूमिका केसरकर यांच्यासह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणूनच जे कोण विरोध करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि जी काही नौटंकी सुरू आहे. ती थांबवावी .आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. लोकांनी आम्हाला आठ नऊ महिने अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेलं आहे. आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे.
लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे. ज्यांना लोकांनी नाकारलेला आहे. त्यांनी लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करू नये. तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी संवाद करायला मी स्वतः पालकमंत्री म्हणून तयार आहे. आम्हाला तिथे वातावरण खराब करायचं नाही. उगाच कुठलाही पोलीस बाळाचा वापर करायचा नाही. जे आंदोलन करत आहेत, काही त्यांची शिष्टमंडळ आहेत. किव्हा समिती केली असेल तर समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोलाव, त्यांच्या काही प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे . आमची भूमिका पारदर्शक आहे . नॅशनल हायवे तयार झाला आहे. त्याप्रमाणे हा शक्तिपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठी केला जाईल आणि म्हणून तो मार्ग गोव्याकडे न जाता आता मळगाव किंवा झिरो पॉईंट असा आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल म्हणून याबाबतीमध्ये कुठलाही विरोध करण्याची काही गरज नाही. कोणालाही संवाद करायचा असेल तर मी कधीही त्याच्यासाठी तयार आहे.असे स्पष्ट मत पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले.