प्रतीक कांबळे:आमच्या संकल्पना प्रत्यक्षात उभारण्यासाठी केसरकरांनी भरघोस मदत केली…
⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मुंबईचे पालकमंत्री असताना आंबेडकरी चळवळीतील तरूण कार्यकर्त्यांच्या असंख्य मागण्या पूर्ण केल्या. भरघोस निधी स्मारकांसाठी दिला. आमच्या संकल्पना प्रत्यक्षात उभारण्यासाठी भरघोस मदत केली. मंत्रीमंडळात आम्हाला आश्वासक चेहरा मिळाला. आंबेडकरी चळवळीतील प्रश्न त्यांनी मार्गी लावले. इथल्या आंबेडकरी जनतेत त्यांची ही प्रतिमा पोहचवत आहोत. गेले आठ दिवस या मतदारसंघात तळ ठोकून आहोत. त्यांचा विरोधक दिसून आला नाही. तेवढ्या ताकतीचा विरोधक नाही. त्यांच्यासाठी ही सोपी निवडणूक असून त्यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन विश्वशांती सामाजिक संस्था अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळ मुंबईचे युवा नेते प्रतीक कांबळे यांनी व्यक्त केले.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कांबळे बोलत होते.
कांबळे म्हणाले, सावंतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यांची सभा या ठिकाणी झाली तिथे दीपक केसरकर यांनी नगराध्यक्ष असताना स्मारक उभारले होते. येथील ठिकाणी सभागृह व्हाव अशी मागणी असून दीपक केसरकर ती निश्चितच पूर्ण करतील. तसेच भारतीय संविधानात मूलभूत हक्क मांडले. देश एकसंघ असण्याचे कारण भारतीय संविधान आहे. ७५ वर्षांत घटनादुरुस्ती कॉग्रेसने केल्यात. त्यामुळे संविधान बदललं असं होतं नाही. तसंच भाजपने केल तर संविधान बदलले असं होतं नाही. नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच वर्षी २६ व २७ नोव्हेंबरला संविधानावर अधिवेशन बोलवलं होत. संविधानावर प्रेम करणारे पंतप्रधान आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संविधान मंदीर संकल्पना सुरू आहे. ही लोक संविधानाला मानणारी आहेत असही त्यांनी सांगितले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ज्येष्ठ नेते राजाराम जाधव, नरेश सपकाळे सुनील डुबळे, शैलेश माने, राजेश माने, स्वप्निल चंदनशिवे आदी उपस्थित होते.
