विनायक राऊत:ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न..
देवगड : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडून येतील व २६ नोव्हेंबर रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शपथ घेईल असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.भाजपामध्ये होत असलेले पक्षप्रवेश हे बंद पाकीटावरील प्रवेश आहेत अशी टीकाही राऊत यांनी केली.
जामसंडे सांस्कृतिक भवन येथे ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी संपन्न झाला.या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत विनायक राऊत बोलत होते.यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, शिवसेना नेते सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, शिवसेना तालुकाप्रमुख मिलींद साटम, जयेश नर, काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी,युवासेना तालुकाध्यक्ष गणेश गावकर, फरीद काझी आदी उपस्थित होते.
विनायक राऊत म्हणाले, महाविकास आघाडीला राज्यात पोषक वातावरण आहे.जनतेचा भ्रष्टाचारी भाजपाला दुर करून महाविकास आघाडीकडे सत्ता देण्याचा कल असून यामुळे या निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडून येवून २६ नोव्हेंबरला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शपथ घेईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.महाविकास आघाडीचा पंचसुत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे तर शिवसेना ठाकरे गटाचाही वचननामा प्रकाशित करण्यात आला आहे.सध्या भाजपामध्ये सुरू असलेले पक्षप्रवेश हे बंद पाकीटावर पैशाचे आमिष दाखवुन आहेत.नैतिकतेवर प्रवेश नसून प्रलोभवनावर आहेत अशी टीका राऊत यांनी केली.शिवसेना नेते अतुल रावराणे प्रकृती बरी नसल्याने प्रचारकार्यात सहभागी झाले नाहीत मात्र ते निष्ठावंत शिवसैनिक असून लवकरच जोमाने प्रचारात उतरतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.भाजपची मंडळी टक्केवारीवर जगणारी आहेत तर शिवसेनेचे कार्यकर्ते हे प्रामाणिक आहेत यामुळे भाजपचा उमेदवारही टक्केवारीचा उमेदवार आहे तर शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार हे प्रामाणिकपणे काम करणारे आहे असे राऊत यांनी सांगीतले.
