गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नका…

आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी:जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिले तोंडी आदेश..

कुडाळ : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना बंदूक गरजेची आहे. त्यामुळे गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नयेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर जिल्हाधिकाऱयांनी तोंडी आदेश दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांकडील शेती संरक्षण बंदूका जमा करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली जात आहे. वन्यप्राणी लोकवस्ती मध्ये घुसून सैरावैरा पळत आहेत. शेतीचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे हवेत गोळीबार करून वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी बंदूक गरजेची आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ही समस्या आ.वैभव नाईक यांच्याजवळ मांडली असता आ.वैभव नाईक यांनी याची तात्काळ दखल घेत आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ज्या शेतकऱ्यांच्या बंदुकांच्या बाबत पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल असतील किंवा तक्रारी असतील त्या बंदुका पोलिसांनी जप्त कराव्यात मात्र कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या शेती संरक्षण बंदुका जमा न करण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी केली.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सध्या भात कापणीचा हंगाम चालु झाला असून वानर,माकड, गवारेडे, डुक्कर भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तर वानर नारळ बागांचे नुकसान करतात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती संरक्षण बंदूका जमा केल्यास शेतीचे आणि फळ बागायतीचे अतोनात नुकसान होणार असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तोंडी आदेश देत ज्या शेतकऱ्यांच्या बंदुकांच्या बाबत पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल असतील त्या बंदुकाच पोलिसांनी जप्त कराव्यात व कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बंदुका जमा न करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

You cannot copy content of this page