असनीये गावाला कोकण विकास संस्थेचा ‘आदर्श गाव पुरस्कार जाहीर…!

बांदा/प्रतिनिधी
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, जैवविविधतेने नटलेल्या तसेच तब्बल ८५ हून अधिक नैसर्गिक पाण्याचे बारमाही स्रोत असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील असनीये गावाला यावर्षीचा कोकण विकास संस्थेचा ‘आदर्श गाव पुरस्कार २०२४’ जाहीर झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्राम पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या गावातून असनीये गावाने सर्वच पातळीवर अव्वल क्रमांक प्राप्त केला. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी मुंबई येथे या पुरस्काराची घोषणा केली.
३१ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवक यांना रोख २५ हजार रुपये, मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्राम पुरस्कारासाठी संस्थेने ऑनलाईन अर्ज मागविले होते. तीनही जिल्ह्यातून ५० हून ग्रामपंचायती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. गावात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय लोकोपयोगी योजना, आरोग्य, शैक्षणिक विषयक उपक्रम, गावातील प्रमुख पिके, शेती व्यवसाय, महिला बचतगट व सक्षमीकरणसाठी राबविण्यात येणारे उपक्रम यावर आधारित निकष ठेवण्यात आले होते. गावात देवराई संवर्धन तसेच धनेश (हॉर्नबिल) पक्षाला संरक्षण देण्यात आले आहे. गाव जैवविविधतेने नटलेला असून अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती पाहावायास मिळतात. वन्य प्राण्यांनी येथील जंगल संपदा समृद्ध असून गावात बारमाही पाण्याचे ८५ हून अधिक स्रोत आहेत. यामुळेच गावात एकही विहीर नसून या गावाला बिन विहिरीचे गाव म्हणून देखील संबोधण्यात येते. या गावात रूढी, परंपरा देखील पाळण्यात येतात. गावात मद्यपान करण्यास बंदी असून दारूबंदी पाळणारे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलेच गाव आहे.
या सर्व निकषावर असनीये गावाने प्रभावी कामगिरी केल्याने असनीये गावाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page