⚡वेंगुर्ला ता.११-: विचार व भावनांचा समतोल तर सकारात्मक वर्तन घडते. प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर कोणत्या वाटेवर आपण जातोय या जाणीवेचे भान असणे आवश्यक आहे. कोणत्याही कार्यात स्वप्रेरणा, स्वऊर्जा महत्त्वाची ठरते. स्वतःला ओळखा, स्वतःला समजून घ्या असे आवाहन मिनाक्षी आळवणी यांनी केले.
येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्यावतीने ‘सहज ट्रस्ट‘च्या अध्यक्षा व मानोसोपचार तज्ज्ञ मिनाक्षी आळवणी (सावंतवाडी) यांचे ‘प्रौढावस्थेच्या उंबरठ्यावर जाण आणि भान‘ या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. मन नावाच्या सहाव्या इंद्रियाचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक व नकारात्मक परिणाम कसा होतो याबाबत मार्गदर्शन केले. समुपदेशनाच्या माध्यमातून नकारात्मक विचारांवर मात करता येते असेही मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी आळवणी यांचे स्वागत केले. प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉ.मनिषा मुजूमदार यांनी, पाहुण्यांचा परिचय डॉ.धनश्री पाटील यांनी तर सूत्रसंचालन फाल्गुनी नार्वेकर हिने केले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन प्रा. वामन गावडे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
