सिंधुदूर्ग जिल्हा अखिल भारतीय मराठा सेवा संघाने दिला पाठींबा..
⚡कणकवली ता.२६-: मराठा समाज गेली अनेक वर्षे आरक्षणाविना वंचित आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी प्रामाणिकपणे स्वतःची जमीन विकत लढा उभारलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना आमच्या अखिल भारतीय मराठा सेवा संघाचा जाहीर पाठींबा आहे.अशी माहिती अखिल भारतीय मराठा सेवा संघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत, उपाध्यक्ष लवू वारंग, सरचिटणीस एस. एल. सपकाळ यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण कुणबी किंवा १६ कुळी मराठा असा भेदभाव करून आपल्यात दुफळी करण्यापेक्षा आरक्षण मिळणे फार महत्वाचे आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षण समिती अध्यक्ष असताना अभ्यासपूर्वक पुरावे गोळा करत समाजाला १६% टक्के दिले होते. मात्र ते आरक्षण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे अनेक शैक्षणिक, नोकर भरतीत मराठा समाजातील मुलांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ५०% मध्येच बसवूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मुद्यांवर आंदोलन केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी मराठा आरक्षण मिळाले तरी मान्य आहे. ज्यांना कुणबी आरक्षणाची गरज नसेल त्यांना नाकाराव. मात्र गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उभारलेल्या लढ्याला आमचा पाठींबा आहे. तसेच विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात असे जाहीर केले. माझ्या शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी लढेन असे त्यांनी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेवून जाहीर केले आहे. मराठा समाजाचे असे म्हणणे आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत त्यांनी मराठा समाजाला ५० टक्केच्या आत आरक्षण देऊन टाकावे. मग रस्त्यावर उतरायची किंवा आरक्षण साठी लढायची वेळ त्यांच्यावर किंवा मराठा समाजावर यापुढे येणार नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण न मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे मराठा समाजाला कुणबी आरक्षण न दिल्यास उपाध्यक्ष लवू वारंग हे स्वतः आपल्या प्राणांची आहुती देत “आत्मदहन” करणार आहेत. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील.असे अखिल भारतीय मराठा सेवा संघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत, उपाध्यक्ष लवू वारंग, सरचिटणीस एस. एल. सपकाळ यांनी सांगितले.
