कोल्हापूर येथील व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
⚡कणकवली ता.२०-: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी आपले योगदान दिले.तरीही जातीच्या उतरंडीवरील सर्व समाजाने त्यांना आपले मानले नाही.असे झाले असते तर देशाच्या घराघरात बाबासाहेबांची जयंती साजरी झाली असती.बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांच्या सांस्कृतिक विरोधकांमुळेच हे असे घडू शकल्याने बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांचे सांस्कृतिक विरोधक अधिक धोकादायक असल्याचे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी केले.
बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कवी अजय कांडर यांचे “युगानुयुगे तूच अर्थात बाबासाहेब सर्वांचे” या विषयावर व्याख्यान झाले.ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी असलेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर ज्येष्ठ विचारवंत प्रा अशोक चौसाळकर, साहित्यिक एकनाथ पाटील उपस्थित होते.
कवी कांडर म्हणाले, बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या राजकीय विरोधकांना समजून घेण्यापेक्षा त्यांनी जो सामाजिक विचार दिला त्या विचाराला विरोध करणाऱ्याला समजून घ्यायला पाहिजे. हा बाबासाहेबांचा विचार कोणता आहे. तर तो समग्र मानव कल्याणचा जातीच्या उतरंडीची दरी नष्ट होण्याचा. शांती,अहिंसा याचा मार्ग दाखवणाऱ्या बुद्ध विचाराचा त्यांनी स्वीकार केला आणि इतरांनाही त्या मार्गावर चालायला लावले.याला विरोध करणारे हे सर्व माणसाच्या माणुसकीच्या विरोधातले आहेत. हे आपण आधी समजून घेतले पाहिजे. दुर्दैवाने बाबासाहेबांना राजकीय विरोध करणाऱ्या माणसांना आपण आपले दुश्मन समजलो आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जात आणि धर्म बळकट करणाऱ्यांना आपण शरण गेलो. या विरोधकांची ही कुटनिती समजून घेतली की बाबासाहेब किती मोठ्या उंचीचे होते हे आपल्या लक्षात येतं.
बाबासाहेबांचे शेतकऱ्यावर विशेषत: वरच्या जातीच्या शेतकऱ्यांवर मोठे उपकार आहेत.कारण बाबासाहेबांनी खोती विरुद्ध दिलेला लढा हा निर्णयक होता. 1957 साली बाबासाहेबांच्या या कृतीविरुद्धच्या लढ्यामुळेच कुळाचे मालक झाले.यासाठी १९३७ साली मुंबई विधान सभेत त्यांनी खोती विरुधचे बील या नावाने कायदा आणला होता. ‘बाबासाहेबांचा खोतीविरुद्धचा लढा आणि शिवरायांचा अठराप्रगड जातीतील एक केलेला मावळा’ अशाच शब्दात त्यांच्या या कार्याचा आपल्याला गौरव करावा लागेल. कारण आजच्या या असहिष्ण काळात वेगवेगळ्या जातीचे जमातीचे ध्रुवीकरण केले जात असताना बाबासाहेबांनी सर्वांसाठी खोतीविरुद्धचा लढलेला लढा आजच्या काळात सर्वाधिक आदर्श असाच आहे.दलितांचे कैवारी म्हणून आपण बाबासाहेबांना छोटे करत नाही तर आपणच छोटे आहोत हेच दाखवून देत आहेत.बाबासाहेब आधी सर्व उपेक्षित घटकासाठी कार्यरत राहिले नंतर ते ज्या वर्गातून आले त्या वर्गासाठी जोमाने कार्यरत राहिले. बाबासाहेबांचे भारतीय हिंदू स्त्रीवर अनंत उपकार आहेत. मात्र याची जाणीव समग्र भारतीय स्त्रीला नाही हे किती दुर्दैवाचे आहे. भारतीय स्त्रीला आज जे अधिकार प्राप्त झाले आहेत यामागे बाबासाहेब यांचीच विचार कृती आहे.
