कराड येथून घेतले ताब्यात
सावंतवाडी ता.०५ : वीट व्यवसायासाठी कामगार पुरवतो असे सांगून घेतलेले तीन लाख रुपये परत न केल्याच्या रागातून मारहाण करताना मृत्यू झालेल्या सुशांत खिल्लारे खून प्रकरणात सावंतवाडी पोलिसांनी कराड येथून अन्य तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या. अभय पाटील (३५), प्रवीण बळीवंत (२५) व राहूल माने (२३, सर्व रा. कराड) अशी या तिघांची नावे आहेत. शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्यासह सावंतवाडी पोलिसांचे पथक कराड येथे रवाना झाले होते. तेथून त्यांनी या तिघांना जेरबंद केले. मारहाणीत त्या तिघांचाही समावेश असल्याची कबूली त्यांनी दिली असून त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
