रिक्षा व्यावसायिकाचा असाही प्रामाणिकपणा

गहाळ झालेले पाकीट पोहोचवले मालकाकडे

*💫कणकवली दि.२४-:* नांदगाव येथील रिक्षा व्यावसायिक प्रमोद तांबे यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण देताना समाजात अजूनही निस्वार्थी माणसे शिल्लक असल्याचे दाखऊन दिले आहे.नांदगाव येथील पत्रकार उत्तम सावंत यांचे नांदगाव प्रवासादरम्यान खिशातील पाकीट गहाळ झाले होते. या पाकीटात एटीएम कार्ड, पैसे तसेच इतर महत्त्वाचे कागदपत्र होते. ‌‌हे गहाळ झालेले पाकीट नांदगाव येथे रिक्षा व्यावसाय करणारे ओटव येथील प्रमोद तांबे यांना सापडले.त्यांनी ते मालकाच्या ताब्यात दिले आहे. रिक्षा व्यवसाय करत असले तरी प्रमोद तांबे हे आर्थिक परिस्थितीने एवढे उत्तम नाहीत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा व्यवसायही तोट्यातच चाललाय. परंतु तरीही प्रमोद तांबे यांनी माणुसकीला जागत आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. या पाकीट मध्ये असलेल्या मोबाईल नंबरवर त्यांनी तात्काळ संपर्क साधला आणि गळाह झालेल्या पाकीटाची माहिती सावंत यांना दिली. त्यानंतर सावंत यांनी त्यांच्या घरी जाऊन पाकीट ताब्यात घेतले. त्या पाकीटमध्ये सर्व पैसे व इतर कागदपत्रे सुस्थितीत असल्याचे पाहून सावंत यांनी प्रमोद तांबे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन आभार मानले आहेत. या आधीही तांबे यांनी रिक्षा मध्ये प्रवाशांनी विसरलेल्या मोबाईल, छत्र्या तसेच इतर वस्तू प्रामाणिकपणे त्यांना दिलेल्या आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक सगळीकडे होत आहे. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे बंधू ओटव पोलिस पाटील व माजी समाजकल्याण सभापती मंगेश तांबे हेदेखिल उपस्थित होते.

You cannot copy content of this page