महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेचा उपक्रम
मालवण (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेने सलग १४ व्या वर्षी गणेश चतुर्थीच्या सणाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सुमारे २४०० महिला सभासदांना ना नफा ना तोटा या तत्वावर कडधान्य वाटप केले.
आचरा विभागातील महिलांना कडधान्य वाटप करताना सिंधुदुर्ग जिल्हा महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर, संस्थेचे संस्थापक व गाबीत समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सौ. गौरी सारंग, सुमाली चोपडेकर, सौ. रंजना खराडे, आदित्य केरकर व बहुसंख्य मत्स्यव्यावसायिक महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सौ. स्नेहा केरकर यांनी या संस्थेची स्थापना झाल्यापासून गेली १४ वर्षे सलग आम्ही हा उपक्रम गोरगरीब मच्छीमार महिलांना गणेश चतुर्थीच्या सणामध्ये मदत करण्यासाठी सुरु ठेवला आहे. त्यास महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यावर्षीही प्रत्येक महिलेला १० किलो कडधान्य वाटप करण्यात आले. विशेषतः किनारपट्टी भागातील कर्ली, पाट, परुळे, केळूस, देवबाग, तारकर्ली, वायरी, देवली, दांडी, धुरीवाडा, मालवण शहर, कोळंब, सर्जेकोट, तळाशील, तोंडवली, रेवंडी, आचरा इत्यादी गावातील सुमारे २४०० सभासद महिलांना वाटप करण्यात आल्याचे सांगितले
यावेळी संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्नेहा केरकर यांचे कौतुक करून गेल्या १४ वर्षांमध्ये आम्ही महिला मत्स्यव्यावसायिकांच्या व्यवसायातील अडचणी दूर करणे, त्यांच्या आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, मासे विक्रीच्या ठिकाणी महिलांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी धरणे आंदोलन व आक्रोश मोर्चा काढून न्याय मिळवून दिला आहे तसेच गरजू महिलांना शासनाच्या विविध योजना प्राप्त करून देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत, याशिवाय आता राज्य शासनाच्या मत्स्य संपदा योजनेतून मिळणाऱ्या नि:शुल्क रुपये ५ हजार अपघाती विमा योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा यासाठी चतुर्थी सणानंतर मत्स्य अधिकाऱ्यांना सोबत घेऊन महिलांची विमा योजनेची नोंदणी करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिक महिलांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
